गेल्या वर्षाचा महाराष्ट्र भूषण, हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी, 16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे.
यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार प्रदान पूर्वतयारी आढावा नवी मुंबईतील, खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात काल घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, ठाणेचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त तिरुपती काकडे, पंकज भुसाने, सांस्कृतिक कार्य संचालनालय सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित होते.
16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 अप्पासाहेबांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे. कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महापालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी. या कार्यक्रमाला लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक काम करावे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे, 35 ते 40 हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, लोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घ्यावी. नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे. आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी चोख ठेवावी. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथके यांनी पूर्ण तयारी ठेवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.