राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन फटके खाल्ल्यानंतर जाग आलेल्या काँग्रेसने आज राष्ट्रवादीला एक फटका देत त्यांच्या नगराध्यक्षांसह २४ नगरसेवकांना आपला हात दिला.
परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोदराव बोराडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील २४ विद्यमान नगरसेवकांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी तसेच औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी, भाजपा, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय, टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, अविनाश काळे, भाजपाचे जिंतूर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख तसेच जिंतूर नगरपालिकेच्या ४ विद्यमान नगरसेवक व दोन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मालेगावातील काँग्रेसच्या २८ नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. त्याआधी भिवंडीतही काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्याचा बदला काँग्रेसने घेतला आहे.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी न करता समन्वयाने काम करावे, असे आवाहन करून सर्वांना धक्काच दिला. महाविकास आघाडीतील आमच्या सहकारी पक्षांचा आम्हाला राग आला आहे. मोठ्यांनी चूक केली तर लहानही काय करू शकतात हे आम्ही दाखवले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारमधल्या सर्व पक्षांचा समन्वय असावा, अशी आमची भूमिका होती. पण, आमच्या सहकारी पक्षांनी मालेगाव, भिवंडीमध्ये जे काही केले, ते योग्य नव्हते. आम्हाला याचा राग आला आहे. पण त्यांच्याबद्दल द्वेष नाही. मोठ्यांनी मोठ्या पद्धतीने राहिले तर त्यांचा सन्मान होतो. मात्र मोठेच चुकीच्या पद्धतीने वागले तर लहानही मोकळे राहू शकतात, हाच संदेश आम्ही यानिमित्ताने देत आहोत, असे पटोले म्हणाले.
आम्ही कोणाला प्रलोभने देत नाही. कोणाशी स्पर्धा नाही. समन्वयाने वागावे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सरकार वेगळे, पक्ष वेगळे आहेत. महाविकास आघाडीत यामुळे कुरबुरी नाहीत, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकार पडणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, भाजपाला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेचे सरकार झाल्यापासून भाजपाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सतत अशी वक्तव्ये करुन ते राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत आहेत.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी. कारण ते देशाच्या आईवर बोलले आहेत. आम्ही हिंसेने उत्तर देणार नाही. मात्र त्यांना जनता माफ करणार नाही. पंतप्रधान संसदेत कसे भाषण करतात, त्यांना जनता कधीही माफी करणार नाही. लोकांना तोडण्याचे काम भाजपा नेहमी करत आहे. जेव्हाजेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप समाजात फूट पाडते, असेही पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर उद्या आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार, असल्याची घोषणाही नाना पटोले यांनी केली. त्याला प्रतिआव्हान देताना भाजपाचे नेत प्रसाद लाड यांनी आंदोलन कराच, तुम्हाला उलटा प्रसाद नाही मिळाला तर सांगा, असा इशारा दिला.

