महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांची १५व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली. एकमताने ही निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. या प्रस्तावाला अनिल पाटील, ॲड. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी विधानसभा अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी नार्वेकर यांच्या नावाचा विधानसभा अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून एकमताने बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयंत पाटील, नितीन राऊत यांनी नार्वेकर यांना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेऊन गेले.
कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यानंतर अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन लोकशाहीचा सन्मान उंचावणारे असते. शिस्तशीर आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत. संवादातून, चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते. नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळालेआहेत.
विधानसभेत पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चारच जणांना मिळाला आहे. नार्वेकर यांना हा बहुमान मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांचे दालन सभागृहातील सर्व पक्षांसाठी हक्काचे दालन असते. सभागृहात कितीही मतभिन्नता झाली तरी हक्काने अध्यक्षांकडे जाता येते. अध्यक्ष दोन्ही बाजूंचे ऐकतात. यावेळीही नार्वेकरांकडे ही जबाबदारी आहे. लोकशाहीत प्रभावी विरोधी पक्ष हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नार्वेकर यांची भूमिका समन्यायी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेऊन कामकाज करण्याची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे नाव विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षांत त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अडीच वर्षांत त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह देशाला दिशा देणारे – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळाचे सभागृह हे देशाला दिशा देणारे सभागृह आहे. या सभागृहाचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. सभागृहाला संवेदनशील अध्यक्ष लाभले असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लोकहितकारी व परिणामकारक निर्णय होतील. कायद्याची उत्तम जाण असणारे अध्यक्ष सभागृहाला लाभले आहेत. सभागृहासमोर आलेल्या प्रश्नांवर तितक्याच ताकदीने उत्तर देऊन त्यांनी सभागृह उत्तम चालविले आहे.
यावेळी जयंत पाटील, नाना पटोले, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत, विश्वजीत कदम, रोहित पाटील यांनीही नार्वेकर यांच्या अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.