हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध आहे. चंद्रगुप्त मौर्य, कर्मफलदाता शनी, राधा कृष्णा या मालिकांनंतर आता तो ‘रागिनी’ या मराठी म्युझिक अल्बमद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ या गाण्यासाठी अभिनेत्री सई कांबळे आणि अभिनेता कार्तिकेय मालवीया हे ७ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हे दोघेही ७ वर्षांपूर्वी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.

अभिनेता कार्तिकेय मालवीया त्याच्या पहिल्यावहिल्या म्युझिक अल्बमविषयी सांगतो की, हा माझा पहिलाच म्युझिक अल्बम आहे आणि त्यात मराठी भाषेत आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. कारण मला मराठी बोलता येत नाही. पण थोडेफार शब्द कळतात. मी सेटवर शूटिंग करताना मराठी गाणं गुणगुणत होतो. पण कधीकधी शब्द चुकत होते. त्यामुळे सेटवर सगळे हसत होते. परंतु आम्ही सगळ्यांनी सेटवर खूप धम्मालमस्ती केली. सचिन सरांनी मला हे गाणं करण्याची संधी दिली. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार!

अभिनेत्री सई कांबळे चित्रिकरणाचा किस्सा सांगताना म्हणते की, मला फार मजा आली शूट करताना. कारण, हे माझं पहिलं गाणं आहे, ज्यात मी लीड एक्ट्रेस आहे. हेवी आऊटफीटमध्ये नृत्य करणं हे फार चॅलेंजिंग होतं. आणि माझे वडील सचिन कांबळे या गाण्याचे दिग्दर्शन करत होते. त्यामुळे मी या गाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. कार्तिकेय आणि मी ७ वर्षांनंतर भेटत होतो. आम्ही रिॲलिटी शोमध्ये असताना सोबत नाश्ता आणि रिअर्सल करायचो. तिथे आम्ही कॉम्पीटीटर होतो. पण या गाण्यात आम्ही लीड होतो. त्यात या गाण्याचं शूटिंग एका दिवसात पार पडलं. तरी आम्ही खूप मजा केली.

दिग्दर्शक सचिन कांबळे ‘रागिनी’ या गाण्याविषयी सांगतात की, मी आतापर्यंत आपली यारी, मी नादखुळा, आपलीच हवा, चिंतामणी माझा, माझी ताई अशा ५०हून अधिक म्युझिक अल्बमचं दिग्दर्शन केलं आहे. काही गाण्यांची कोरिओग्राफीसुद्धा मी केलीय. मला खूप दिवसांपासून एनर्जेटीक आणि डान्सीकल गाणं करण्याची इच्छा होती. म्हणूनच आम्ही ‘रागिनी’ हे गाणं करण्याचा विचार केला. सई आणि कार्तिकेय हे दोघेही इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिॲलिटी शोमध्ये एकमेकांचे कॉम्पीटीटर जरी असले तरी त्यांची छान मैत्री होती. ‘रागिनी’ गाण्यातदेखील त्यांची रिअल बॉन्डिंग चांगल्याप्रकारे दिसून आले आहे. रागिनी हे गाणं आरती पाठक हिने लिहीले असून गायक मधूर शिंदे आणि गायिका अंशिका चोणकर यांनी गायले आहे. संगीत संयोजन आशिष पडवळने केले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. असंच प्रेम कायम असू द्या!


