गेल्या १० वर्षांत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली त्याचीच साक्ष देत आहे. ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशिर्वादाने कल्याण-डोंबिवली मतदारसंघात येत्या निवडणुकीत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील. पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या प्रचंड रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि महायुतीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात कडक्याच्या उन्हातदेखील कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. कल्याण-डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या रॅलीतून दिसली. शासन म्हणून पुढची पाच वर्षं कल्याण-डोंबिवलीसाठी निधी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख होती. पण निवडून आल्यानंतर विकासकामांतून त्यांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लोक गावी गेले आहेत. त्यांना मतदानासाठी बोलवा. बुथवर आपल्याला जास्त काम करायचे आहे. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी बाहेर काढायचे आहे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदींना मत. त्यामुळे सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करा. पुढची पाच वर्षं खासदार तुमची सेवा करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.