Details
कर्मवीर नरेंद्र पाटील!
04-Jan-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
नरेंद्र तथा एन. टी. पाटील यांचे दि. 27 डिसेंबर रोजी जयसिंगपूर येथे निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेरपर्यंत त्यांची तब्ब्येत ठणठणित होती. चांगल्या प्रकृतीचे त्यांना वरदानच लाभले होते. त्यांच्या दोन चिरंजीवांपैकी ज्येष्ठ चिरंजीव संजीव हे जयसिंगपूरमध्ये तर नितीन हे अहमदाबादमध्ये असतात. पाटील काकांचा पिंड सदैव लढण्याचा राहिला. अन्याय, भ्रष्टाचार आणि गैरकारभार यांची त्यांना सदैव चीड होती. वार्धक्यातदेखील त्यांनी लढणे सोडले नाही. मुंबईत नेहरू नगर, कुर्ला येथे एकटेच राहत असताना ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील भ्रष्टाचाराविरुद्ध आणि गैरकारभाराविरुद्ध एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत राहिले. वयाची आणि प्रकृतीची पर्वा न करता पायपीट करत राहिले. अखेर काही वर्षांपूर्वी त्यांचे चिरंजीव संजीव त्यांना जयसिंगपूर येथे घेऊन गेले. त्यांची काळजीपूर्वक देखभाल करू लागले. पण काका तेथूनदेखील ग्रंथसंग्रहालयातील गैरकाराभाराविरुद्ध आणि तेथील कर्मचार्यांच्या प्रश्नावर लढत राहिले. ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी अखेरपर्यंत जे जे करता येईल ते ते केले. पण तेथील गैरकारभार नष्ट करण्यात त्यांना यश आले नाही हे आपले दुर्दैव.
काका, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सख्खे पुतणे होते. पण, आपली ही ओळख ते कधीच कोणाला सांगत नसत. कारण नरेंद्र पाटील काका हे स्वत: कर्मवीर होते. आमचे वडील शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे यांचे ते निकटचे स्नेही होते. बाबा काकांविषयीची एक आठवण नेहमी सांगत. ती म्हणजे आमच्या बारशाच्या वेळी, आम्ही पाळण्यात असताना, काकांनी पाच रूपयांची नोट आमच्या हातात ठेवली होती. काकांचा हातगुण असा की आम्हाला आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासली नाही. आर्थिक चढउतार अनेक आले. पण ते दूरदेखील होत गेले. आयुष्यात आपल्या हातात पहिली नोट कोणी ठेवली हे कोणीच सांगू शकत नाही. पण आम्ही सांगू शकतो. हे आमचे भाग्य नाही काय?
काका प्रिमीअर कंपनीत चांगल्या हुद्यावर नोकरीला होते. तेथील युनियनचे ते नेते होते. पण कामगारांची मुले फुलपँट घालू शकत नाहीत म्हणून, ऐपत असतानादेखील, आपल्या मुलांना ते हाफपँट घेऊन देत. मुलांच्या हट्टाकडे दुर्लक्ष करून त्यांना ते आपली अडचण समजावून सांगत. आज किती कामगार नेते अशाप्रकारे तत्त्वनिष्ठ राहून काम करत असतील? काका कोण नव्हते? ते प्रिमीअरमध्ये नोकरीला होते. म्हणजे ते कर्मचारी होते. तेथील युनियनचे ते नेते होते. ते कुर्ला नागरिक सहकारी बँकेचे अनेक वर्षे चेअरमन होते. म्हणजे ते बँकर होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ते विश्वस्त होते. ‘कुर्ला नागरिक’ या साप्ताहिकाचे अनेक वर्षे मालक-संपादक होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते सन्माननीय सदस्य होते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे ते त्यागमूर्ती व्यक्तिमत्व होते. अशा या आमच्या आदरणीय काकांच्या निधनाने समाजाची फार मोठी हानी झाली आहे. काकांना आमची भावपूर्ण आदरांजली..”

