काँग्रेस सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून महाराष्ट्राचे माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजासाठी जो मुद्दा मांडला त्याची अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीच्या पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल घेतली असून यापुढे कॉँग्रेसमार्फत सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल, असे आश्वासन पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी आज प्रदेश कॉँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉँग्रेसने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजाला प्रतिनिधित्व दिले नसल्याने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय समाजात पक्षाबद्दल चुकीचा संदेश जात असून त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल असे स्पष्ट मत पक्षश्रेष्ठींकडे मांडणारे प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांचा मुद्दा एकदम योग्य आहे. नसीम खान यांनी पुण्यात राहुल गांधी यांची भेट घेतली व मी त्यांना निवेदन केले की जो राजीनामा त्यांनी दिलेला आहे तो परत घ्यावा व प्रचारकार्यात सक्रीय व्हावे, असे चेन्नीथल्ला म्हणाले.

अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजाची भावना मी अखिल भारतीय काँग्रेसला कळवली होती. माझ्या पत्राची पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दखल घेतली. समाजाच्या वतीने मी काही मुद्दे मांडले होते. येणाऱ्या काळात त्यावर पक्ष योग्य तो न्याय देईल. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असून राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्या लढाईत मजबूतपणे सहभागी होत इंडिया आघाडीचा पंतप्रधान व्हावा यासाठी काम करणार, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले.
यानंतर रमेश चेन्नीथल्ला व नसीम खान यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी नसीम खान यांच्या समर्थनाथ राजीनामा दिलेला आहे त्यांनी तो परत घेऊन पूर्ण ताकदीने प्रचारकार्यात सक्रिय व्हावे व मुंबईसह राज्यातील कॉँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

