काँग्रेसने एक देश, एक संविधान लागू करण्यात अडथळे आणले. 70-75 वर्षे बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशात लागू नव्हते. याला जबाबदार कोण? कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संविधान लागू करण्याचे काम मोदींनी केले. त्यामुळे बाबासाहेबांचा आत्मा जिथे कोठे असेल, तेथून काश्मीरमधले कलम 370 हटविल्याबद्दल धन्यवाद देत असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले.
नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे उमेदवार राजू पारवे आणि भंडारा-गोंदियाचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ कन्हान येथे झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल आदी यावेळी उपस्थित होते.

कलम 370 हटवून देशाला काय मिळणार ही काँग्रेसी भूमिका म्हणजे, काँग्रेसच्या गरीब, आदिवासी आणि व्होट बँकेच्या राजनीतीचा जिवंत पुरावा आहे. 370 कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीरातील जनतेला सर्व संविधानिक लाभ मिळाले आहेत. दलित, महिला, गरीबांना नागरिकत्वाचे सारे हक्क प्राप्त झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे ही जनता वंचित होती. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार जम्मू काश्मीरच्या लोकांना नव्हते. आता ते मिळाले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
देशातील समाजात फूट पाडण्यासाठी इंडी आघाडीचे निकराचे प्रयत्न सुरू असून संघटितपणे त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रालोआला मतदान करा. जनता संघटित झाली तर इंडी आघाडीचे राजकारणच संपून जाईल अशी त्यांना भीती आहे. पण त्या आघाडीला ताकद मिळाली तर देशाचे तुकडे तुकडे होतील. आता त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. म्हणूनच त्यांनी आता मोदींना लक्ष्य केले आहे. घराणेशाहीची मक्तेदारी संपुष्टात आणून गरीबाघरचा मुलगा सत्तेवर आला, हे त्यांना सहन होत नसल्यामुळेच मोदींवर वैयक्तिक हल्ले सुरू झाले आहेत. असे असले तरी मी देशसेवेच्या माझ्या संकल्पापासून मागे हटणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर लोकशाही संपुष्टात येईल, अशी अफवा अलीकडे इंडी आघाडीवाले पसरवत आहेत. मी सत्तेवर आलो तेव्हापासून ते हीच भाषा बोलत आहेत. हीच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी असून त्यांच्याकडे नवे मुद्देच नाहीत, नव्या कल्पनाच नाहीत. आणीबाणीच्या काळात सरकारवर एका परिवाराचा कब्जा होता, तेव्हा लोकशाही संकटात नव्हती का? एक गरीबाचा पुत्र सत्तेवर आला, तेव्हाच यांना अचानक लोकशाही संकटात आल्याचा साक्षात्कार कसा होतो, असा सवाल त्यांनी केला.

