महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असून पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. यंदा बारावीचे १४ लाख ७२ हजार तर दहावीचे १६ लाख २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याने ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक गुण असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
परीक्षेच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाची परीक्षा देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेला देण्याची संधी असेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचे बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीतजास्त २५ विद्यार्थी असतील. त्यांना एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी जवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येईल. शाळेत अधिक विद्यार्थी असल्यास त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल. यावेळेस प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा देण्यासाठी दोन संधी असतील. पहिली संधी १४ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान असेल. या कालावधीत जे विद्यार्थी लेखी आणि तोंडी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा या परीक्षा देण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले.
कोरोनामुळे एखाद्या विद्यार्थ्यावर दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची वेळ आल्यास नव्याने शुल्क भरावे लागणार नाही. तोंडी परीक्षा दोनदा देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही. परीक्षेनंतर ४५ दिवसांमधे निकाल लावण्यात येईल. प्रॅक्टिकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक परीक्षक म्हणून यावेळेस येणार नाहीत. त्याच शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम करतील. मुख्य परीक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकूण अभ्यासक्रमाच्या ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असतील, असेही गोसावी यांनी सांगितले.

