काँग्रेस आणि कम्युनिस्टांना डावलून तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात येथील सत्तेतल्या काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यादेखत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्याशी राजकीय चर्चा करणार आहेत.
ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यावर येताच त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. संध्याकाळी त्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये पोहोचतील आणि तेथेच त्या मुक्काम करणार आहेत. या काळात ते शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी येथील तसेच दिल्लीतील राजकीय विषयावर चर्चा करतील. या दौऱ्यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार होत्या. मात्र, प्रकृती आस्वास्थ्यामुळे रूग्णालयात असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांना न भेटण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला. त्यानंतर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करण्याचे ठरले. हे दोन्ही नेते बॅनर्जी यांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत.
उद्या सिल्व्हर ओकवर
ममता बॅनर्जी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, निवासस्थानी भेट घेणार आहेत. दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक पहिल्या दिवशी कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेतल्या विरोधी पक्षांच्या १२ सदस्यांना या सत्रासाठी निलंबित करण्यात आले. मागच्या अधिवेशनात घातलेल्या गोंधळाच्या कारणांमुळे हे निलंबन करण्यात आले. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलावली होती. परंतु, ममता बॅनर्जी यांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर त्यांची शरद पवार यांच्याबरोबर होणारी भेट महत्त्वाची मानली जात आहे.
देशात भारतीय जनता पार्टीला पर्याय उभा करण्यासाठी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष तसेच या दोन्हींचे मित्रपक्ष यांना टाळून एक सक्षम पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करत आहेत. त्याचदृष्टीने पवार यांच्याबरोबर त्या चर्चा करणार असल्याचे कळते.
या तीन दिवसांमध्ये ममता बॅनर्जी इथल्या उद्योगपतींना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बंगाल बिझनेस समिटचे निमंत्रण देणार आहेत. त्याशिवाय प. बंगालमध्ये विविध उद्योगांना नेण्यासाठीही त्यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

