Details
`बंद’ सम्राट!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
लहानपणापासून जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव ऐकत आलो होतो. आपल्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद करणारे जॉर्ज फर्नांडिस हे `बंद सम्राट’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. आक्रमक कामगार नेते म्हणून लोक त्यांना ओळखत होते. मात्र अशा या नेत्याचे पहिले भाषण आम्ही ऐकले ते 1982 साली. मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगारांचा विक्रमी संप सुरू होता. डॉ. दत्ता सामंत गिरणी कामगारांसाठी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत होते. त्यांना विरोध करण्यासाठी शिवतीर्थावर एक प्रचंड मोठी सभा बोलाविण्यात आली. शिवसेनेच्या त्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवार हे तीन दिग्गज नेते होते. या तिघांनीही डॉ. सामंतांवर जोरदार टीका केली. त्यांनी संप मागे घ्यावा म्हणून त्यांना काही दिवसांची जाहीर नोटीस दिली. अर्थात संप मागे घेतला गेला नाही. पण त्या सभेत जॉर्ज फर्नांडिस यांचे भाषण मात्र आम्ही पहिल्यांदा ऐकले. त्यांचे पहिले वाक्य होते, `आज दसरा आहे. पण आनंद कुठे आहे?’ त्यांचे हे पहिलेच वाक्य संपकरी गिरणी कामगार आणि इतर कष्टकरी वर्ग यांच्या हृदयाला भिडणारे होते.
फर्नांडिस यांचे ते अस्खलित मराठीतील भाषण ऐकून आम्ही प्रभावित झालो. पुढे काही महिन्यांनी नर्दुला टँक मैदानावर डॉ. सामंत आणि फर्नांडिस एका मंचावर आले. त्या सभेत जॉर्ज म्हणाले, `मी जेव्हा जेव्हा मुंबईला येतो तेव्हा तेव्हा गिरणी कामगारांबद्दल दत्ताला विचारतो. गिरणी कामगारांची चौकशी करतो.’ जॉर्ज हे बोलत असताना डॉ. सामंत त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. अर्थात जॉर्ज खोटे बोलत होते. एव्हाना कामगार नेते म्हणून आपली भूमिका संपवून ते पट्टीचे राजकीय नेते झाले होते. राजकारणात गेल्यावर माणसाला खोटे बोलावेच लागते, हे वेगळे सांगणे न लगे.
आम्हाला जॉर्ज यांचे दोन चांगले अनुभव आले. ते येथे नमूद केलेच पाहिजेत. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा करार जॉर्ज यांच्या युनियनने केला होता. त्यानिमित्त परळच्या दामोदर हॉलमध्ये ते आणि शरद राव विजयी मेळाव्यासाठी आले होते. आम्ही जॉर्ज यांना स्टेजवर जाण्याआधीच अडविले. त्यांना म्हटले, `तुम्ही भाषणात काय बोलणार ते सांगा. मला बातमी द्यायची आहे.’ जॉर्ज आमच्यासोबत एका बाजूला उभे राहिले. नंतर त्यांनी लाखांच्या जमावापुढे बोलावे, तसे भाषण आमच्यापुढे दहा मिनिटे दिले. शेवटी शरद राव यांनी त्यांना थांबवून व्यासपीठावर नेले. आम्हाला अधिकवेळ न थांबता बातमी मिळाली म्हणून आम्ही खूश झालो.
दुसरा अनुभवदेखील असाच महत्त्वाचा आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर जोरदार टीका करणारा अग्रलेख आम्ही लिहिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या एका मराठी भाषिक पदाधिकाऱ्याने `शिवनेर’ला पत्र पाठवून तीव्र शब्दांत आमचा निषेध केला. जॉर्ज यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्या पदाधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. काही दिवसांनी ते मुंबईला आले असता त्यांनी आमचे वडील `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांना फोन करून त्या निषेधाच्या पत्राबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले की, `मी आमच्या त्या पदाधिकाऱ्याला सांगितले की, वर्तमानपत्रातील टिकेचा निषेध काय करतोस? त्या टीकेचे स्वागत करायला शिक.’ जॉर्ज यांचा हा खिलाडूपणा निश्चितच स्तुत्य होता.
कामगार नेते म्हणून जॉर्ज यांनी एक काळ गाजवला. साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांचे जीवन होते. पण राजकारणात शिरकाव केल्यानंतर मात्र जॉर्ज पक्के राजकारणी बनले. त्यांनी एकेकाळचे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना लोकसभा निवडणुकीत हरवून इतिहास घडविला. पण कामगारांचे नेतृत्त्व करता करता जॉर्ज राजकारणात गेले आणि कामगारांना विसरले. वाजपेयी मंत्रिमंडळाने अनेक कामगारविरोधी निर्णय घेतले. पण मंत्रिमंडळांच्या त्या बैठकांमध्ये जॉर्ज यांनी त्या निर्णयांना कधीच विरोध केला नाही. जॉर्ज यांच्या निधनाने भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक अध्याय संपला आहे.”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
लहानपणापासून जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव ऐकत आलो होतो. आपल्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद करणारे जॉर्ज फर्नांडिस हे `बंद सम्राट’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. आक्रमक कामगार नेते म्हणून लोक त्यांना ओळखत होते. मात्र अशा या नेत्याचे पहिले भाषण आम्ही ऐकले ते 1982 साली. मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगारांचा विक्रमी संप सुरू होता. डॉ. दत्ता सामंत गिरणी कामगारांसाठी एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढत होते. त्यांना विरोध करण्यासाठी शिवतीर्थावर एक प्रचंड मोठी सभा बोलाविण्यात आली. शिवसेनेच्या त्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवार हे तीन दिग्गज नेते होते. या तिघांनीही डॉ. सामंतांवर जोरदार टीका केली. त्यांनी संप मागे घ्यावा म्हणून त्यांना काही दिवसांची जाहीर नोटीस दिली. अर्थात संप मागे घेतला गेला नाही. पण त्या सभेत जॉर्ज फर्नांडिस यांचे भाषण मात्र आम्ही पहिल्यांदा ऐकले. त्यांचे पहिले वाक्य होते, `आज दसरा आहे. पण आनंद कुठे आहे?’ त्यांचे हे पहिलेच वाक्य संपकरी गिरणी कामगार आणि इतर कष्टकरी वर्ग यांच्या हृदयाला भिडणारे होते.
फर्नांडिस यांचे ते अस्खलित मराठीतील भाषण ऐकून आम्ही प्रभावित झालो. पुढे काही महिन्यांनी नर्दुला टँक मैदानावर डॉ. सामंत आणि फर्नांडिस एका मंचावर आले. त्या सभेत जॉर्ज म्हणाले, `मी जेव्हा जेव्हा मुंबईला येतो तेव्हा तेव्हा गिरणी कामगारांबद्दल दत्ताला विचारतो. गिरणी कामगारांची चौकशी करतो.’ जॉर्ज हे बोलत असताना डॉ. सामंत त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. अर्थात जॉर्ज खोटे बोलत होते. एव्हाना कामगार नेते म्हणून आपली भूमिका संपवून ते पट्टीचे राजकीय नेते झाले होते. राजकारणात गेल्यावर माणसाला खोटे बोलावेच लागते, हे वेगळे सांगणे न लगे.
आम्हाला जॉर्ज यांचे दोन चांगले अनुभव आले. ते येथे नमूद केलेच पाहिजेत. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा करार जॉर्ज यांच्या युनियनने केला होता. त्यानिमित्त परळच्या दामोदर हॉलमध्ये ते आणि शरद राव विजयी मेळाव्यासाठी आले होते. आम्ही जॉर्ज यांना स्टेजवर जाण्याआधीच अडविले. त्यांना म्हटले, `तुम्ही भाषणात काय बोलणार ते सांगा. मला बातमी द्यायची आहे.’ जॉर्ज आमच्यासोबत एका बाजूला उभे राहिले. नंतर त्यांनी लाखांच्या जमावापुढे बोलावे, तसे भाषण आमच्यापुढे दहा मिनिटे दिले. शेवटी शरद राव यांनी त्यांना थांबवून व्यासपीठावर नेले. आम्हाला अधिकवेळ न थांबता बातमी मिळाली म्हणून आम्ही खूश झालो.
दुसरा अनुभवदेखील असाच महत्त्वाचा आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर जोरदार टीका करणारा अग्रलेख आम्ही लिहिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या एका मराठी भाषिक पदाधिकाऱ्याने `शिवनेर’ला पत्र पाठवून तीव्र शब्दांत आमचा निषेध केला. जॉर्ज यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्या पदाधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. काही दिवसांनी ते मुंबईला आले असता त्यांनी आमचे वडील `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांना फोन करून त्या निषेधाच्या पत्राबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले की, `मी आमच्या त्या पदाधिकाऱ्याला सांगितले की, वर्तमानपत्रातील टिकेचा निषेध काय करतोस? त्या टीकेचे स्वागत करायला शिक.’ जॉर्ज यांचा हा खिलाडूपणा निश्चितच स्तुत्य होता.
कामगार नेते म्हणून जॉर्ज यांनी एक काळ गाजवला. साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांचे जीवन होते. पण राजकारणात शिरकाव केल्यानंतर मात्र जॉर्ज पक्के राजकारणी बनले. त्यांनी एकेकाळचे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना लोकसभा निवडणुकीत हरवून इतिहास घडविला. पण कामगारांचे नेतृत्त्व करता करता जॉर्ज राजकारणात गेले आणि कामगारांना विसरले. वाजपेयी मंत्रिमंडळाने अनेक कामगारविरोधी निर्णय घेतले. पण मंत्रिमंडळांच्या त्या बैठकांमध्ये जॉर्ज यांनी त्या निर्णयांना कधीच विरोध केला नाही. जॉर्ज यांच्या निधनाने भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक अध्याय संपला आहे.”

