Details
ये मराठी टक्का क्या है भाई?
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनचा धगधगता काळ आठवला की आजही मराठी माणसाची छाती अभिमानाने तटतटून येते. मुंबई आपली, महाराष्ट्र आपला असे आपण गेली कित्येक वर्षे अभिमानाने गर्जत आलो आहोत. प्रत्यक्षात मराठी माणसाचा टक्का या मराठी मातीतूनच हळूहळू कमी होत चालला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालाने मुंबईतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालल्याचा इशारा दिला आहे. पण हे काही आजचे नाही. १९८० च्या निवडणुकांत तेव्हाच्या चिपळूण मतदारसंघात प्रचारासाठी फिरत होतो. तेव्हा चिपळूण स्टँडच्या मागे दीपक लॉज आणि खानावळीत भेटलेल्या एका दाक्षिणात्य व्यक्तीने त्यांच्या मंदिराचा विषय काढल्यावर, सहज विचारले की किती दाक्षिणात्य व्यक्ती वा विक्रेते चिपळूणला असतील? त्याने त्यावेळी दिलेले उत्तर विलक्षण होते. तो म्हणाला चिपळूण ते रत्नागिरी या पट्ट्यातच आमचे साधारण ६०० सदस्य आहेत. आणखी पुढे जाऊन कुणी व्यवसाय करत असतील ते वेगळे. त्यानंतरच्या काही वर्षांत मग खाली सिंधुदूर्गातही केरळी बांधवांनी येऊन रबर लागवड वगैरे सुरू केली, हॉटेलं टाकली तो वेगळा इतिहास.
या सगळ्यांना परप्रांतीय असा शब्द वापरात यायला तेव्हा काही वर्षे अवधी होता. त्याआधीच कुठूनकुठून महाराष्ट्रात येऊन काही पिढ्या स्थिरावून इथल्याच झालेल्या इतर राज्यांतील समाजाने राज्याची समृद्धता वाढवली होती. पण नंतर या राज्याच्या समृद्धतेने, उद्यमशीलतेने, रोजगारांच्या, व्यवसायांच्या संधीने, आर्थिक आघाडीने रोजगाराच्या शोधातील लोंढ्यांना आकृष्ट केले. शेजारच्या राज्यांतून जणू मुंबईवर आक्रमणच व्हायला सुरूवात झाली. जो येतो तो मुंबईकडे धावला अशी स्थिती झाली. शेजारधर्म संपला, राज्याची क्षमता संपली. मुंबईसोबत राज्याच्या इतर भागांतही आपल्या हिंदी भाषिक शेजाऱ्यांनी हातपाय पसरले. ही प्रक्रिया गेली १५ ते २० वर्षे सुरू आहे. आता गेल्या आठ वर्षांत पाहिले तर मुंबईतला मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय. तोही तब्बल दहा पटीने. मराठी माणसांनी मोठ्या घरांसाठी ठाणे, नालासोपरा, डोंबिवली, कल्याण ते अगदी टिटवाळा, कर्जतपर्यंत वाट धरली आणि मुंबई इतर भाषिकांना मोकळी झाली.
आता हिंदी भाषिकांचा टक्का या महानगरीत वाढला आहे. याचा परिणाम लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवर गेली काही वर्षे स्पष्टपणे दिसतो आहेच. प्रत्येक व्यवसायात, रोजगाराच्या अनेक क्षेत्रांत हिंदी भाषिकांनी बस्तान बसवल्यामुळे त्यांची टक्केवारी वाढते आहे. 2011 च्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा आकडा 40 टक्क्यांनी वाढला आहे. 2001 मध्ये ही संख्या 25.88 लाख होती, तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली आहे. म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिक वाढले. त्याचवेळी मराठी माणूस 2.64 टक्क्यांनी घटला. 2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑप पॉप्युलेशन सायन्सचे राम बी. भगत यांनी त्यांच्या “Population Change and Migration in Mumbai Metropolitan Region: Implications for Politics and Governance” या अभ्यासात मराठी टक्का घसरल्याचा तपशील दिला आहे. या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या 1961 मध्ये 41.06 टक्के होती, ती 2001 मध्ये 37.4 टक्के झाली. तर याच काळात उत्तर प्रदेशातून 1961 मध्ये 12 टक्के व्यक्ती यायच्या त्या आता 24 टक्के म्हणजे दुप्पटीने येतात. बिहारमधून येणाऱ्यांची संख्याही 3.5 टक्क्यांवर गेली आहे. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांतही हिंदी भाषिकांचे प्रमाण वाढले आहे.
अहवाल सांगतो त्यानुसार, मुंबईतील मराठी भाषकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली आहे तर हिंदी भाषिकांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. शेजारील ठाणे जिल्ह्यातही 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले आहे तर कल्याण आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००१ च्या जनगणनेत आपली मातृभाषा मराठी असल्याचे 45 लाख 23 हजार लोकांनी नोंदवले होते. 2011 मध्ये केवळ 44 लाख 4 हजार लोक मराठी मातृभाषा असल्याचे सांगतात हे गंभीर मानले पाहिजे. लाखभऱ मराठी लोक गेले कुठे? मतांच्या टक्केवारीकडे लक्ष ठेवून असणारे राजकीय पक्ष आणि नेत्यांना या मराठी टक्क्याचे काही पडलेले नाही हे वारंवार दिसत असतेच. त्यांना मराठी मतांपेक्षा हिंदी मतांवर निवडून येणे अधिक सोपे आहे. आता पुढली जनगणना २०२१ ला होईल. मराठी माणूस कुठेही गेलेला नाही उलट वाढलेला आहे, हे या जनगणनेतून दिसून येईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. शेजारच्या आपल्या गोव्यातही मराठी माणूस दीड लाखाने घटला आहे. देशात मराठी मातृभाषा म्हणून नोंद केलेल्यांची संख्या 8.30 कोटी आहे. असे असताना ये मराठी टक्का क्या है भाई, असे विचारण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासूनचा धगधगता काळ आठवला की आजही मराठी माणसाची छाती अभिमानाने तटतटून येते. मुंबई आपली, महाराष्ट्र आपला असे आपण गेली कित्येक वर्षे अभिमानाने गर्जत आलो आहोत. प्रत्यक्षात मराठी माणसाचा टक्का या मराठी मातीतूनच हळूहळू कमी होत चालला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालाने मुंबईतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालल्याचा इशारा दिला आहे. पण हे काही आजचे नाही. १९८० च्या निवडणुकांत तेव्हाच्या चिपळूण मतदारसंघात प्रचारासाठी फिरत होतो. तेव्हा चिपळूण स्टँडच्या मागे दीपक लॉज आणि खानावळीत भेटलेल्या एका दाक्षिणात्य व्यक्तीने त्यांच्या मंदिराचा विषय काढल्यावर, सहज विचारले की किती दाक्षिणात्य व्यक्ती वा विक्रेते चिपळूणला असतील? त्याने त्यावेळी दिलेले उत्तर विलक्षण होते. तो म्हणाला चिपळूण ते रत्नागिरी या पट्ट्यातच आमचे साधारण ६०० सदस्य आहेत. आणखी पुढे जाऊन कुणी व्यवसाय करत असतील ते वेगळे. त्यानंतरच्या काही वर्षांत मग खाली सिंधुदूर्गातही केरळी बांधवांनी येऊन रबर लागवड वगैरे सुरू केली, हॉटेलं टाकली तो वेगळा इतिहास.
या सगळ्यांना परप्रांतीय असा शब्द वापरात यायला तेव्हा काही वर्षे अवधी होता. त्याआधीच कुठूनकुठून महाराष्ट्रात येऊन काही पिढ्या स्थिरावून इथल्याच झालेल्या इतर राज्यांतील समाजाने राज्याची समृद्धता वाढवली होती. पण नंतर या राज्याच्या समृद्धतेने, उद्यमशीलतेने, रोजगारांच्या, व्यवसायांच्या संधीने, आर्थिक आघाडीने रोजगाराच्या शोधातील लोंढ्यांना आकृष्ट केले. शेजारच्या राज्यांतून जणू मुंबईवर आक्रमणच व्हायला सुरूवात झाली. जो येतो तो मुंबईकडे धावला अशी स्थिती झाली. शेजारधर्म संपला, राज्याची क्षमता संपली. मुंबईसोबत राज्याच्या इतर भागांतही आपल्या हिंदी भाषिक शेजाऱ्यांनी हातपाय पसरले. ही प्रक्रिया गेली १५ ते २० वर्षे सुरू आहे. आता गेल्या आठ वर्षांत पाहिले तर मुंबईतला मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय. तोही तब्बल दहा पटीने. मराठी माणसांनी मोठ्या घरांसाठी ठाणे, नालासोपरा, डोंबिवली, कल्याण ते अगदी टिटवाळा, कर्जतपर्यंत वाट धरली आणि मुंबई इतर भाषिकांना मोकळी झाली.
आता हिंदी भाषिकांचा टक्का या महानगरीत वाढला आहे. याचा परिणाम लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवर गेली काही वर्षे स्पष्टपणे दिसतो आहेच. प्रत्येक व्यवसायात, रोजगाराच्या अनेक क्षेत्रांत हिंदी भाषिकांनी बस्तान बसवल्यामुळे त्यांची टक्केवारी वाढते आहे. 2011 च्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा आकडा 40 टक्क्यांनी वाढला आहे. 2001 मध्ये ही संख्या 25.88 लाख होती, तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली आहे. म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिक वाढले. त्याचवेळी मराठी माणूस 2.64 टक्क्यांनी घटला. 2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑप पॉप्युलेशन सायन्सचे राम बी. भगत यांनी त्यांच्या “Population Change and Migration in Mumbai Metropolitan Region: Implications for Politics and Governance” या अभ्यासात मराठी टक्का घसरल्याचा तपशील दिला आहे. या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांची संख्या 1961 मध्ये 41.06 टक्के होती, ती 2001 मध्ये 37.4 टक्के झाली. तर याच काळात उत्तर प्रदेशातून 1961 मध्ये 12 टक्के व्यक्ती यायच्या त्या आता 24 टक्के म्हणजे दुप्पटीने येतात. बिहारमधून येणाऱ्यांची संख्याही 3.5 टक्क्यांवर गेली आहे. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांतही हिंदी भाषिकांचे प्रमाण वाढले आहे.
अहवाल सांगतो त्यानुसार, मुंबईतील मराठी भाषकांची संख्या अडीच टक्क्यांनी घटली आहे तर हिंदी भाषिकांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. शेजारील ठाणे जिल्ह्यातही 80 टक्के हिंदी भाषिक वाढले असून रायगडमध्ये हे प्रमाण 87 टक्क्यांनी वाढले आहे तर कल्याण आणि मीरा-भाइंदरमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००१ च्या जनगणनेत आपली मातृभाषा मराठी असल्याचे 45 लाख 23 हजार लोकांनी नोंदवले होते. 2011 मध्ये केवळ 44 लाख 4 हजार लोक मराठी मातृभाषा असल्याचे सांगतात हे गंभीर मानले पाहिजे. लाखभऱ मराठी लोक गेले कुठे? मतांच्या टक्केवारीकडे लक्ष ठेवून असणारे राजकीय पक्ष आणि नेत्यांना या मराठी टक्क्याचे काही पडलेले नाही हे वारंवार दिसत असतेच. त्यांना मराठी मतांपेक्षा हिंदी मतांवर निवडून येणे अधिक सोपे आहे. आता पुढली जनगणना २०२१ ला होईल. मराठी माणूस कुठेही गेलेला नाही उलट वाढलेला आहे, हे या जनगणनेतून दिसून येईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. शेजारच्या आपल्या गोव्यातही मराठी माणूस दीड लाखाने घटला आहे. देशात मराठी मातृभाषा म्हणून नोंद केलेल्यांची संख्या 8.30 कोटी आहे. असे असताना ये मराठी टक्का क्या है भाई, असे विचारण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे.”

