Homeमुंबई स्पेशलमुंबई महापाल‍िकेच्या ५...

मुंबई महापाल‍िकेच्या ५ व‍िद्यार्थ्यांनी मिळवली राष्ट्रीय श‍िष्यवृत्ती!

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस (National Means cum Merit Scholarship Scheme Exam) मध्ये बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या शाळांमधील एकूण पाच व‍िद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून ज‍िल्हा गुणवत्ता यादीत (मेरीट लिस्ट) स्थान पटकावले आहे. अभ‍िमानाची बाब म्हणजे बृहन्मुंबई  महानगरपालिका शिक्षण विभागाच्या इतिहासात या परीक्षेत प्रथमच तब्बल पाच व‍िद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

या यशवंत विद्यार्थ्यांमध्ये खुशी कोकर (रमाबाई सहकार नगर महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २, मुंबई उत्तर), दक्षता ऐलमकर (सिटी आफ लास एंजलिस महानगरपालिका मराठी शाळा, मुंबई दक्षिण), वेदांती मोरे (गोशाळा महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक १, मुंबई उत्तर), (४) रहमान शेख (देवनार वसाहत महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक २, मुंबई उत्तर), (५) उमरहुसेन शेख (अंधेरी पश्चिम मुंबई पब्लिक स्कूल) या व‍िद्यार्थ्यांचा समावेश आहे.

‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती’ ही संपूर्ण भारतात इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा आहे. महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येते. गतवर्षी २१ डिसेंबर २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात आली. मुंबई महापालिका शाळांतील इयत्ता आठवातील ४० विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यातील एकूण पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत (मेरीट) झळकले आहेत. या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पालिकेचे विद्यार्थी प्रथमच या परीक्षेस बसले होते. पहिल्याच वेळी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये येऊन घवघवीत यश मिळवले आहे. या यशाने हे पुनश्च अधोरेखित केले की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विद्यार्थी राज्यस्तरावरील मुलांसोबत केवळ स्पर्धेत उतरतात असे नाही तर या परीक्षेवर पालिकेचा ठसादेखील उमटवतात.

या परीक्षेची उद्दिष्टे

इयत्ता ८वीच्या वर्गात शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, तसेच श‍िक्षणासह आर्थ‍िक सहाय्य मिळावे, विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आण‍ि आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी यासाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा घेण्यात येते.

श‍िक्षणासाठी मिळते पाठबळ

केंद्र शासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) (नवी दिल्ली) यांनी सन २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता ८वी) ही परीक्षा सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर एकाच दिवशी एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतील शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा एक हजार रुपये (वार्षिक बारा हजार रुपये) इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. आता या पाच विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षे म्हणजे इयत्ता १२वीपर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील शिष्यवृत्ती मिळव‍िण्यासाठी इयत्ता ९वी व ११वीमध्ये किमान ५५ टक्के तसेच इयत्ता दहावीत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

 

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content