भरारी प्रकाशनच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच झाला. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, आमदार पराग आळवणी, कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी स्मिता भागवत लिखित ‘क्रांतिवीराच्या सुरस चित्तरकथा’, माधवी कुंटे लिखित ‘ज्ञात-अज्ञात’ कादंबरी, लता गुठे लिखित ‘मन सैरभैर मात्र’ आणि प्रशांत राऊत लिखित ‘आनंद नांदे अंतरी’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
भरारी प्रकाशनच्या वतीने प्रत्येक वर्षी क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी क्रांतिवीरांच्या जीवन प्रवासावर आधारित लता गुठे पुस्तक प्रकाशित करत आहेत. ही फारच स्तुत्य गोष्ट आहे, असे डॉ. स्नेहलता देशमुख आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामागे अनेक क्रांतिविरांचे बलिदान आहे ते विसरुन आपल्याला चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाशिका लता गुठे यांनी प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला क्रांतिवीरांवरील पुस्तकं प्रकाशित करण्याचे व्रत घेतलं आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा देऊन जास्तीतजास्त वाचकांपर्यंत व आजच्या तरुण मुलांपर्यंत ही पुस्तके पोहोचवली पाहिजेत. हीच खरी समाजाची देशाची सेवा आहे, असे पराग अळवणी म्हणाले.
क्रांतिवीरांवर पुस्तके का प्रकाशित करावीशी वाटली याचे उत्तर देताना लता गुठे म्हणाल्या की, देहापासून देवाकडे जाण्यासाठी मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो, या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनाप्रमाणे या समाजाचे, देशाचे ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी, विलेपार्ले येथील नगरसेविका ज्योती अळवणी व नगरसेवक अभिजीत सामंत हेही उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील डॉ. महेश घाटपांडे, जयश्री संगीतराव, एड. व्ही व्ही गुठे, डॉ. संपदा पाडगावकर, गुरुनाथ तेंडुलकर, मिलिंद शिंदे अशी मान्यवर मंडळीही याप्रसंगी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले.

