Homeकल्चर +निसर्गसंपन्न कोकणातले ‘थ्री...

निसर्गसंपन्न कोकणातले ‘थ्री ऑफ अस’!

“थ्री ऑफ अस” ही महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर चित्रित नाट्यमय नातेसंबंधांची कथा आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यात शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि कलाकार-संगीतकार स्वानंद किरकिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

गोव्यात सुरू असलेल्या 53व्या इफ्फीमध्ये ‘टेबल टॉक्स’ सत्रात बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण म्हणाले की, मी माझ्या बालपणीची तीन-चार वर्षे कोकणात होतो. निसर्गाशी माझी पहिली ओळख कोकणच्या भूमीतच झाली. माझ्या चित्रपटातून मी नेहमीच माझ्यातलं मूल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषतः या चित्रपटातही मी तसा प्रयत्न केला आहे. या भागाविषयी मला माझ्या बालपणापासून आकर्षण आहे. याआधी, मी मराठी चित्रपट ‘किल्ला’ बनवला होता. त्यानंतर आठ वर्षांनी मी हा चित्रपट बनवला आहे.

यावेळी, चित्रपटातील कलाकार, जयदीप अहलावत म्हणाले की, या चित्रपटात अभिव्यक्त करण्यात आलेल्या भावना, शब्दांत मांडणं अशक्य आहे. अविनाश आणि मी फिल्म स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि याआधी आम्ही ‘पाताल लोक’मध्ये एकत्र कामही केले आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांची कार्यशैली दीर्घकाळापासून माहीत आहे. या चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास, मी इथे त्याबद्दल सगळं काही सांगू शकत नाही. हा चित्रपट पडद्यावर अनुभवण्याचा विषय आहे.

जलसा, ह्यूमन, डार्लिंग्स किंवा दिल्ली क्राइम-2मधील आपल्या अप्रतिम बॅक टू बॅक परफॉर्मन्सने वर्षभर चित्रपटप्रेमींना गुंतवून ठेवणारी अभिनेत्री शेफाली शाह म्हणाली की, हा चित्रपट जितका विवाहाविषयी आहे, तितकाच तो जीवनावरही आहे. मला पटकथा मुळात वन लाइनर म्हणून सांगण्यात आली होती. आतापर्यंत मी अतिशय सशक्त व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. यावेळी बदल म्हणून मी एका असुरक्षित आणि दुर्बळ स्त्रीचे पात्र रंगवले आहे. खरं तर हेच त्या पात्राचे सौंदर्य आहे. पण, मी समर्थ आहे. याचा अर्थ मी असुरक्षित पात्र साकारू शकत नाही, असा नाही. दोन्ही व्यक्तिरेखा सुंदर असतात. दोघांपैकी एकाची निवड का करावी? सामर्थ्य आणि असुरक्षितता अशा दोन्ही भावना आपल्या प्रत्येकामध्ये असतात.

चित्रपटाचे छायाचित्रण अप्रतिम आहे. अविनाश अरुण यांनी दिग्दर्शक आणि छायादिग्दर्शक म्हणून अप्रतिम काम केले आहे. हा चित्रपट आपल्याला एखाद्या पेंटिगसारखा दिसेल. निसर्गसंपन्न कोकणाच्या पर्यटनाची एक उत्तम जाहिरात या चित्रपटातून होईल, असेही शेफाली शाह म्हणाल्या.

या चित्रपटात, शेफालीची अत्यंत दुर्बल अशी व्यक्तिरेखा आहे. जयदीपने एका हसऱ्या आनंदी व्यक्तिची भूमिका केली आहे, तर मी गीतकार, ज्याला गाता येत नाही, अशा व्यक्तीचा अभिनय केला आहे. आम्ही जसे नाही, तसे या सिनेमात दिसणार आहोत. प्रत्येकाला अशी भूमिका मिळावी असे स्वप्न असते. ते आमचे स्वप्न या सिनेमामुळे साकार झाले, असे अभिनेता-गीतकार स्वानंद किरकिरे यांनी यावेळी सांगितले.

भारतीय पॅनोरामा विभागात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.  

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content