बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार, ३१ मार्च २०२३पासून वेगाने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात लागू आहे. जलबोगदा पाणी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी ही १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. मात्र, पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थिती यांच्या मर्यादा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी हा जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद केला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई महापालिका क्षेत्रासाठी व मुंबई महापालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात ३१ मार्च २०२३पासून १५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.

असे असले, तरी पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडूप संकुल जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा करताना मुंबई शहर व उपनगरातील काही भागात, उंचावर राहणाऱ्या आणि पाणीवाटप क्षेत्राच्या टोकाकडील लोकवस्तीस १५ टक्क्यांपेक्षा जास्त, पाणीकपात जाणवू शकते. या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी पालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वितरण व्यवस्था व महानगरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील सर्व नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.