महाराष्ट्रातल्या ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्त्याने खासगी वाहनांतून परत येण्यासाठी निघाले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडचे आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्यशासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
नेपाळमधली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्यशासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.