Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“लॉकडाऊनच्या काळात विविध वीज कंपन्यांकडून पावण्यात आलेल्या वाढीव वीजबीलांतून सर्वसामान्यांना सूट द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची याकरीता भेट घेण्याचा सल्ला दिल्याने हे राज्य नेमके कोण चालवते, असा प्रश्न चर्चेला आला आहे.”
“राज्यपालांची भेट घेताना राज ठाकरे यांच्याबरोबर राजभवनात बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते.”
“लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीईएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करू शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पक्षाचे एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडन लेखी स्वरुपात पत्र आले. कंपन्या वीज बिले कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आमचे त्यांच्यावर दडपण नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मग सरकार का थांबले आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी नंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.”
“राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झाले. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ असे सांगितले. त्यांनीही एकदा शरद पवारांशी बोलून घ्या सांगितले. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटते हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. लोकांना जिथे २००० बिल येत होते तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकले आहे कळत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.”
“याचा निर्णय तत्काळ घ्यायला पाहजे. त्याच्यासाठी पहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे. शरद पवारांशी फोनवरुन किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार. राज्यपालही बोलणार आहेत. पण, सरकार आणि राज्यपालांचे फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे सरकार कुंथत कुंथत काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.”

