HomeArchiveराज्य शासकीय कर्मचारी...

राज्य शासकीय कर्मचारी शक्तीचा एल्गार!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“कोरोनाच्या महासंकटाचा मुकाबला सर्व सरकारी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून प्राणपणाने करित आहेत. असे असले तरी केंद्र व राज्य शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरण जोरात सुरू ठेवले आहे. सरकारच्या भांडवलदारधार्जीण्या धोरणांमुळे देश आणि राज्यातील समस्त कामगार वर्ग, शेतकरी बांधव आणि तळागाळातील सामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. याविरोधात देशभरातील सर्व श्रमिकांनी सशक्त आवाज उठवणे अत्यावश्यक झाले. कामगारविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्त्वाखाली दिनांक ९ ते ११ ऑगस्ट असे तीन दिवस आंदोलन पुकारण्यात आले.”
 
“रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदानात सकाळी ११ वाजता मूक निदर्शने करण्यात आली. सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी प्रत्येक कार्यालयासमोर भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शने करण्यात आली आणि उद्या, मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी प्रत्येक कार्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे चेतनादिन साजरा करण्यात येणार आहे.”
 
 
 
“दि. ९ ऑगस्ट रोजी कामगारविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशव्यापी आंदोलन झाले. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानातील मूक निदर्शनांना मुंबई जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज मुंबईतल्या आरोग्य भवन, नागपाडा पोलीस रुग्णालय, मस्य विभाग, शासकीय परिवहन सेवा, सेंट जॉर्ज रुग्णालय येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.”
 
“कोरोनाच्या नावाखाली सुरू असलेली वेतन कपात, संभाव्य भत्ते गोठवणूक, महामारीशी लढताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी या महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल शासनाने तातडीने मध्यवर्ती संघटनेला चर्चेसाठी आमंत्रित करावे असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी केले आहे. राज्य शासनाने या राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले आहे.”
 
संघटनेने केलेल्या मागण्या
 
1) पी एफ आर डी ए अंतर्गत अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
 
“2) बदली, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे.”
 
3) सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. या भरतीत अनुकंपाधारकांना प्राधान्य देण्यात यावे.
 
“4) Covid-19 योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे वैयक्तिक सुरक्षा उपकरण (पी पी ई), रबरी हातमोजे, नाकाला आणि तोंडाला मास्क, डोक्याला प्लास्टिक कव्हर, रबराचे बूट, चष्मा, आणि फेस शील्ड आदींचा त्वरित पुरवठा करण्यात यावा आणि त्यांना विमा मुदतवाढ देण्यात यावी. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या सर्व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा क्वारंटाईन कालावधी राज्यभर एकसारखाच असावा आणि या कालावधीत त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्थाही करण्यात यावी.”
 
5) महागाई भत्ता गोठवण्याचे धोरण रद्द करून जुलै 2019पासून अद्यावत महागाई भत्ता मागील फरकासह देण्याचे शासन निर्णय व्हावेत.
 
6) सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा व तो सत्वर देण्याचे शासन निर्णय व्हावा. 
  

 
7) वेतनत्रुटी संदर्भातला बक्षी समिती – खंड दोन त्वरित प्रकाशित करावा.
 
8) सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यात यावे.
 
9) मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मिळण्यातील अडचणी दूर कराव्यात.
 
10) बृहन्मुंबई परिसरातील कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वे आणि बसेसच्या अधिक फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात.
 
11) महामारीच्या या काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवाल आणि सेवापुस्तकात तशी नोंद घेऊन त्यांना आगाऊ वेतनवाढी द्याव्यात.
 
12) यावर्षी बदल्यांचे सत्र रद्द केले होते. परंतु आता पुन्हा १५ टक्के बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदल्यांमध्ये फक्त विनंती बदल्या आणि पती-पत्नी एकत्रिकरणाचा विचार करून या बदल्या कराव्यात.
 
उपरोक्त सर्व मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मध्यवर्ती संघटनेचा आजवरचा इतिहास हा संघर्षमय असून कर्मचाऱ्यांनी सर्व लाभ लढ्यातूनच मिळविले आहेत. केंद्रीय आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे सध्याच्या कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दौंड यांनी सांगितले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content