Details
मुख्यमंत्रीपदासाठी भांडणारे युतीतील मुंगेरीलाल!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
जे राज्य प्रगतीशील, द्रष्ट्या नेत्यांच्या नावाने ओळखले जात होते, ज्या राज्याला धुरंधर राजकीय नेत्यांची परंपरा आहे त्या राज्यातील विद्यमान सत्ताधारी पक्षांनी मुख्यमंत्रीपदावरून भांडणं सुरू करून खुजेपणा दाखवावा हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे मुख्यमंत्रीपद तरी कुठले तर ज्या विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, जागावाटप झालेले नाही, जी खिचडी शिजलेलीच नाही ती शिजून, आपले सरकार येऊन आपलाच मुख्यमंत्री विराजमान होणार अशा मुंगेरीलालच्या स्वप्नांमधले. राज्यासमोर इतके बिकट प्रसंग असताना, राज्याचा आर्थिक शकट डळमळीत असताना, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न भेडसावत असताना ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतात, जे अद्याप झालेलेच नाही ते झाल्याचे समजून, सरकार आपलेच आल्याचे समजून भांडावेसे वाटते त्या मुंगेरीलाल नेत्यांना खुजे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे?
अवघ्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या चेहऱ्यांनी का होईना पण उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकांसाठी २३-२५ असा शिवसेना-भाजपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आणि त्याचबरोबर विधानसभेसाठी जागांचे समसमान वाटप आणि आमचेच सरकार पुन्हा येणार या अनाकलनीय आत्मविश्वासातून सरकारमधील मंत्रीपदांचेही समान वाटप असे जाहीर करण्यात आले. देशप्रेम, राम मंदिर, नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा मुद्द्यांमुळे आणि सर्वसामान्यांच्या व्यापक हिताला समोर ठेवून युती केल्याचे सांगण्यात आले. एकट्या उद्धव ठाकरे यांनी फक्त शिवसेना-भाजपाच्या मनात दडलेल्या सत्याला जरासा स्पर्श केला. ५० वर्षे ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांना काय म्हणून सत्ता द्यायची, असे ते म्हणाले. समोर बसलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना टाळून या तीनही नेत्यांनी घाईघाईत काढता पाय घेतला. युती कुणालाच मनोमनी मान्य नसल्याचे तिन्ही नेत्यांच्या देहबोलीतून दिसत होतेच. पण ते तत्काळ दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रियांमधूनही जगजाहीर झाले.
सोशल मीडियावर तर टीकेचा भडिमार झाला. वाघाच्या गळ्यात पट्टा अडकवून मोदी निघाल्याची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. तरीही मातोश्रीवर मोजक्या शिवसैनिकांपुढे उद्धव ठाकरे यांनी त्यांची तुतारी वाजवली. भाजपासोबतच्या तहामध्ये आपण जिंकलो आहोत. आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी लढत आहोत. त्यामुळे ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही, असे सांगत त्यांनी नाराज शिवसैनिकांना चुचकारण्याचा प्रयत्नही केला. आधी, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असा करार होता. मात्र, मी ते स्वीकारले नाही. मी समसमान आणले. आपले जे स्वप्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा, ते मी पूर्ण करणारच, असा समसमानचा त्यांच्या परीने अर्थ उद्धव आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही लावला आहे. म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांकडे राहणार. पण त्यासाठी सत्ता मिळाली पाहिजे, लोकांनी स्वीकारले पाहिजे. ते होण्याआधीच हारतुऱ्यांची स्वप्ने शिवसेना पाहू लागली आहे. अर्थात भाजपाची याला तयारी नाहीच. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी तातडीने शिवसेनेच्या या स्वप्नाळू फुग्याला टाचणी लावली. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा प्रश्नच येत नाही, ते भाजपाकडेच असेल, असे पाटीलअण्णा म्हणाल्यावर शिवसेनेतून रामदासभाई उसळले. मुख्यमंत्रीपद बऱ्या बोलाने अडीच वर्षे आमच्याकडे द्या नाहीतर युती तुटली समजा, असा गलका त्यांनीही केला. या मंडळींना लोकप्रतिनिधी म्हणावे की सत्तेच्या पत्रावळ्यांसाठी आतुरलेले लाचार म्हणावे हेच या नळावरच्या भांडणामुळे कळेनासे झाले आहे. कुठे गेला तो जनतेचा कळवळा, शेतकऱ्यांविषयीचा गहिवर, देशप्रेमाची आच?
भाजपाने युती केलीय ती लोकसभेसाठी अडचणीत आहे म्हणून. भाजपा ही युती विधानसभेसाठी कायम ठेवण्याची शक्यता फार कमी आहे. २०१४ चे उदाहरण फार लांबचे नाही. अशावेळी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेची ही भांडाभांडी म्हणजे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा, त्यांना फसवण्याचाच एक प्रकार असू शकतो. भलत्याच गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवून लोकसभा तरी पदरात पाडून घेण्याचा शिवसेना आणि भाजपाचा प्रयत्न आहे. पण भिवंडीपासून मुलुंड आणि जालनापर्यंत युती झाल्याच्या घोषणेनंतर उमटलेले तीव्र नाराजीचे पडसाद पाहाता दोन्ही पक्षांसाठी ही युती टिकवणे महाकठीण आव्हान ठरणार आहे. लोकसभा होईपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा समेवर येणार नाही आणि शिवसेनेलाही येऊ देणार नाही. शिवसेनेने अगदीच हा मुद्दा लावून धरल्यास हो ला हो करत भाजपा लोकसभा निवडणूक पार पाडील असे दिसते आहे. आशिष शेलार, किरीट सोमय्या यांना त्यासाठीच गप्प बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी जो काही कलगीतुरा सुरू झाला आहे तो म्हणजे सत्तेसाठी नंगानाच आहे, असे समर्पक वर्णन आमदार नितेश राणे यांनी केले आहे. युतीतील मुंगेरीलालना आणखी काय बोलायचे?”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
जे राज्य प्रगतीशील, द्रष्ट्या नेत्यांच्या नावाने ओळखले जात होते, ज्या राज्याला धुरंधर राजकीय नेत्यांची परंपरा आहे त्या राज्यातील विद्यमान सत्ताधारी पक्षांनी मुख्यमंत्रीपदावरून भांडणं सुरू करून खुजेपणा दाखवावा हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे मुख्यमंत्रीपद तरी कुठले तर ज्या विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, जागावाटप झालेले नाही, जी खिचडी शिजलेलीच नाही ती शिजून, आपले सरकार येऊन आपलाच मुख्यमंत्री विराजमान होणार अशा मुंगेरीलालच्या स्वप्नांमधले. राज्यासमोर इतके बिकट प्रसंग असताना, राज्याचा आर्थिक शकट डळमळीत असताना, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न भेडसावत असताना ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतात, जे अद्याप झालेलेच नाही ते झाल्याचे समजून, सरकार आपलेच आल्याचे समजून भांडावेसे वाटते त्या मुंगेरीलाल नेत्यांना खुजे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे?
अवघ्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या चेहऱ्यांनी का होईना पण उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकांसाठी २३-२५ असा शिवसेना-भाजपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आणि त्याचबरोबर विधानसभेसाठी जागांचे समसमान वाटप आणि आमचेच सरकार पुन्हा येणार या अनाकलनीय आत्मविश्वासातून सरकारमधील मंत्रीपदांचेही समान वाटप असे जाहीर करण्यात आले. देशप्रेम, राम मंदिर, नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा मुद्द्यांमुळे आणि सर्वसामान्यांच्या व्यापक हिताला समोर ठेवून युती केल्याचे सांगण्यात आले. एकट्या उद्धव ठाकरे यांनी फक्त शिवसेना-भाजपाच्या मनात दडलेल्या सत्याला जरासा स्पर्श केला. ५० वर्षे ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांना काय म्हणून सत्ता द्यायची, असे ते म्हणाले. समोर बसलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना टाळून या तीनही नेत्यांनी घाईघाईत काढता पाय घेतला. युती कुणालाच मनोमनी मान्य नसल्याचे तिन्ही नेत्यांच्या देहबोलीतून दिसत होतेच. पण ते तत्काळ दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रियांमधूनही जगजाहीर झाले.
सोशल मीडियावर तर टीकेचा भडिमार झाला. वाघाच्या गळ्यात पट्टा अडकवून मोदी निघाल्याची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. तरीही मातोश्रीवर मोजक्या शिवसैनिकांपुढे उद्धव ठाकरे यांनी त्यांची तुतारी वाजवली. भाजपासोबतच्या तहामध्ये आपण जिंकलो आहोत. आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी लढत आहोत. त्यामुळे ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही, असे सांगत त्यांनी नाराज शिवसैनिकांना चुचकारण्याचा प्रयत्नही केला. आधी, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असा करार होता. मात्र, मी ते स्वीकारले नाही. मी समसमान आणले. आपले जे स्वप्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा, ते मी पूर्ण करणारच, असा समसमानचा त्यांच्या परीने अर्थ उद्धव आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही लावला आहे. म्हणजे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांकडे राहणार. पण त्यासाठी सत्ता मिळाली पाहिजे, लोकांनी स्वीकारले पाहिजे. ते होण्याआधीच हारतुऱ्यांची स्वप्ने शिवसेना पाहू लागली आहे. अर्थात भाजपाची याला तयारी नाहीच. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी तातडीने शिवसेनेच्या या स्वप्नाळू फुग्याला टाचणी लावली. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा प्रश्नच येत नाही, ते भाजपाकडेच असेल, असे पाटीलअण्णा म्हणाल्यावर शिवसेनेतून रामदासभाई उसळले. मुख्यमंत्रीपद बऱ्या बोलाने अडीच वर्षे आमच्याकडे द्या नाहीतर युती तुटली समजा, असा गलका त्यांनीही केला. या मंडळींना लोकप्रतिनिधी म्हणावे की सत्तेच्या पत्रावळ्यांसाठी आतुरलेले लाचार म्हणावे हेच या नळावरच्या भांडणामुळे कळेनासे झाले आहे. कुठे गेला तो जनतेचा कळवळा, शेतकऱ्यांविषयीचा गहिवर, देशप्रेमाची आच?
भाजपाने युती केलीय ती लोकसभेसाठी अडचणीत आहे म्हणून. भाजपा ही युती विधानसभेसाठी कायम ठेवण्याची शक्यता फार कमी आहे. २०१४ चे उदाहरण फार लांबचे नाही. अशावेळी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेची ही भांडाभांडी म्हणजे नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा, त्यांना फसवण्याचाच एक प्रकार असू शकतो. भलत्याच गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवून लोकसभा तरी पदरात पाडून घेण्याचा शिवसेना आणि भाजपाचा प्रयत्न आहे. पण भिवंडीपासून मुलुंड आणि जालनापर्यंत युती झाल्याच्या घोषणेनंतर उमटलेले तीव्र नाराजीचे पडसाद पाहाता दोन्ही पक्षांसाठी ही युती टिकवणे महाकठीण आव्हान ठरणार आहे. लोकसभा होईपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा समेवर येणार नाही आणि शिवसेनेलाही येऊ देणार नाही. शिवसेनेने अगदीच हा मुद्दा लावून धरल्यास हो ला हो करत भाजपा लोकसभा निवडणूक पार पाडील असे दिसते आहे. आशिष शेलार, किरीट सोमय्या यांना त्यासाठीच गप्प बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी जो काही कलगीतुरा सुरू झाला आहे तो म्हणजे सत्तेसाठी नंगानाच आहे, असे समर्पक वर्णन आमदार नितेश राणे यांनी केले आहे. युतीतील मुंगेरीलालना आणखी काय बोलायचे?”

