Details
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण ही दोन्ही खाती आली असल्याने मुंबईत नाईट लाईफची त्यांची कल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. पर्यटन खात्यामध्ये राज्याला आर्थिक सुबत्तेकडे नेण्याची क्षमता असल्याची स्वतः युवराज आणि चौथ्या पिढीचे ठाकरे यांची धारणा असल्याने मध्यरात्रीनंतरची मुंबईदेखील यात योगदान देऊ शकणार आहे.
“आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांची तसंच व्हिडिओग्राफीची स्पर्धा जाहीर केली आहे. त्याआधी मंत्री होण्यापूर्वी आमदार झाल्याझाल्या त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन नाईट लाईफ, या त्यांच्या कल्पनेतल्या उपक्रमाची चर्चेच्या पातळीवर सुरूवात करत निवडक मॉल्समध्ये मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत खाद्यपदार्थ देण्यासंदर्भात चर्चा केली आहे.”
“पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर एक रिव्ह्यू वा आढावा बैठक घेऊन त्यांनी खात्यात काय काय करता येईल, याची माहिती नुकतीच घेतली आहे. त्याबरोबरच प्रादेशिक पातळीवर पर्यटन आराखडे बनवून या क्षेत्रातून पर्यटक आणि गुंतवणूक कशी येईल, याचाही ते विचार करणार आहेत. मुंबईत बुधवारी झालेल्या एक दिवसाच्या विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाईट लाईफच्या त्यांच्या संकल्पनेबद्दल फार काही सांगितले नाही. पण लवकरच करू, अशा शब्दात त्यांनी मध्यरात्रीनंतरची मुंबई आता अधिकृतरीत्या जागी राहील, याचे सूतोवाच केले आहे.”

