Details
महाराष्ट्र दीन आणि कामगारही दीन!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
गर्जा महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा..
पूर्वी हे शब्द कुठूनही जरी कानावर आले तरी मनात डफ वाजायला लागायचा, शाहिरी खडा आवाज कानात घुमायचा आणि अंगावर रोमांच उठायचे. महाराष्ट्राभिमानाच्या भावनेने मन उचंबळून यायचे, मान ताठ व्हायची, छाती तटतटून यायची.. आज १ मे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनही आहे. पण राज्याची आणि देशाचीही सध्याची अवस्था फारशी सुखावह नाही. आर्थिक धोरणांनी राज्याला गळफास लावला आहे, बेरोजगारी वाढते आहे. अशा वेळी महाराष्ट्र दीन आणि कामाच्या शोधात भटकणारे, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील कामगारांचे, श्रमिकांचे तांडेही दीन अशी केविलवाणी अवस्था आजच्या १ मे रोजी समाजातील निम्न स्तरावरील शोषित, वंचित वर्ग अनुभवतो आहे. त्यात कामगार आले, शेतकरी आले, उपनगरांमधील नाक्यांवर रोजगाराची वाट पाहत कपभर चहावर, भाकरी अन् तिखटावर दिवस काढणारे कष्टकरी आले आणि फक्त नोकऱ्यांच्या मागे धावणारे शहरी भागातील पदवीधर, तरूणही आले. दिवसाचा खर्चही निघत नसलेले छोटे व्यावसायिकही आले आणि भजी, वडापावच्या गाड्या लावणारेही आले.
परिस्थिती चिंताजनक आहे. नुकताच प्रसिद्ध झालेला सीएमआयईचा अहवाल हेच वास्तव सांगतो. तर असा हा महाराष्ट्र आणि राज्यभरातील कामगार वर्ग, बेरोजगार तरूण कामाची, उद्योगसमुहांची, परकीय गुंतवणुकीची वाट बघतो आहे. सोशल मीडियावर कुठलाही सणवार म्हटला की शुभेच्छांचे तुषार उमलतात पण, राज्यालाच अशी मरगळ आली आहे की महाराष्ट्र दिन उजाडला तरी आपल्या राज्याच्या निर्मितीदिनाच्या शुभेच्छा मात्र फार आवेगाने सोशल मीडियावर उमटलेल्या दिसत नाहीत. ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ जण हुतात्मे झाले त्यांचा धगधगता इतिहासही फार कुणाला स्मरणात नाही आणि नव्या पिढीतील बहुसंख्यांना त्याचे काही पडलेले नाही. महाराष्ट्र दिन म्हणजे सुट्टी, ड्राय डे असे मेसेज पाठवणाऱ्यांसमोर हा इतिहास उगाळून फायदा तरी काय?
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र त्यावेळी पेटला होता. खड्या आवाजाचे शाहीर सर्वसामान्य जनतेला ललकारत होते, चेतवत होते. पं. नेहरू, स. का. पाटील यांच्या नकारात्मक भूमिकेनंतर राज्यात जो जनक्षोभ उसळला त्यात काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष भस्मसात होण्याची वेळ आली होती. १०६ जणांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले. तेव्हा कुठे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला. संयुक्त महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरलेल्या सत्याग्रहींवर, आंदोलकांवर अंहमन्य, हेकेखोर मोरारजी देसाई गोळ्या घालण्याचे आदेश देत असतानाही लोक मागे हटायला तयार नव्हते. त्या स्फुल्लिंगांची जाणीव आजच्या पिढीला नाही. महाराष्ट्रातील, ज्या मुंबईसाठी अवघ्या राज्याने आंदोलन केले त्या मुंबईतील मराठी टक्का तर आता घटलाच आहे. यंदाच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर मतदार गणनेत दिसून आले. अनेक भागांत बाहेरच्या राज्यांतून आलेले नागरिक संख्येने अधिक आहेत. मूळ मराठी, मूलनिवासींची संख्या कमी होते आहे. कुणाला पडलंय त्याचे काही? मराठी माणसाच्या नावाने नेहमीच गळे काढणाऱ्या, मुठी आवळून दाखवणाऱ्या राजकीय पक्षांनाही त्याचे सोयरसूतक नाही. त्यांचे सारे गणित मतांशी जुळलेले आहे.
या राज्याच्या निर्मितीसाठी १९५५ ते १९६० अशा पाच वर्षांत ६८ हजार लोकांनी तुरूंगवास पत्करला होता. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात दीडेक हजार अपंग झाले. १०६ हुतात्मे वेगळेच. त्यावेळी मराठी माणूस अन्यायाविरोधात उभा ठाकत होता. अरेला कारेने उत्तर मिळायचे. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य सर्वांच्याच नसानसांतून महाराष्ट्राभिमान रक्तासमवेत उसळ्या घेत असायचा. आज याच सर्वांची अवस्था बिकट आहे. धनदांडगे, राजकारणी मस्तीत असताना कष्टकऱ्यांचा आवाज क्षीण होतो आहे, असे खंतावणारे चित्र आहे. ज्या मुंबईसाठी एकेकाळी महाराष्ट्र लढला, भिडला तीच मुंबई वेगळी करण्यासाठी गुपचूप फुसकुल्या सोडून अंदाज घेतला जातो. महत्त्वाची कार्यालये, उद्योगव्यवसाय बिनबोभाट शेजारच्या राज्यात हलवले जातात. पण मराठी मनांना पूर्वीसारखा राग येत नाही, मुठी आवळल्या जात नाहीत. विरोधाचा कणखर आवाज उमटत नाही. सत्ताधारी पाहत असलेल्या विकासाच्या स्वप्नांसाठी, महागड्या प्रकल्पांसाठी, अनावश्यक बुलेट ट्रेन आदी पांढऱ्या हत्तींसाठी राज्याला, येथील भूमीपूत्रांना त्यांच्या घरादारांची, जमीनींची, आयुष्यभराच्या कमाईची किंमत मोजावी लागत आहे. शासकीय दमनयंत्रणेपुढे एकट्यादुकट्याचा कधीच पाड लागत नाही. अशी हजारो उदाहरणे अवतीभवती आहेत.
ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा, कर्तृत्त्वाचा, समाजसुधारणांचा वारसा लाभला आहे तेथे वर्ग-वर्णभेद उफाळळून येत आहेत. नकोशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार होऊ लागली आहे. सामाजिक सौहार्द, सलोख्याचे वातावरण विषारी होऊ लागले आहे. याचे कुणालाच काहीही वाटत नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे असे दामटून सांगताना सामाजिक खदखद दुर्लक्षिली जात आहे, शोषितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. कुपोषण, भारनियमन, दुष्काळ, शिक्षण-आरोग्यसेवेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, कर्जमाफी या समस्या सोडवण्यापेक्षा न होणारी स्मारके, गोरगरिबांना काडीचाही उपयोग नसलेले महागडे प्रकल्प याचाच वरवंटा राज्यातील जनतेच्या उरावरून फिरवला जात आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना आपला महाराष्ट्र असा दीन होत आहे ही जाणीव मन घायाळ करते आहे.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
गर्जा महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा..
पूर्वी हे शब्द कुठूनही जरी कानावर आले तरी मनात डफ वाजायला लागायचा, शाहिरी खडा आवाज कानात घुमायचा आणि अंगावर रोमांच उठायचे. महाराष्ट्राभिमानाच्या भावनेने मन उचंबळून यायचे, मान ताठ व्हायची, छाती तटतटून यायची.. आज १ मे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनही आहे. पण राज्याची आणि देशाचीही सध्याची अवस्था फारशी सुखावह नाही. आर्थिक धोरणांनी राज्याला गळफास लावला आहे, बेरोजगारी वाढते आहे. अशा वेळी महाराष्ट्र दीन आणि कामाच्या शोधात भटकणारे, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील कामगारांचे, श्रमिकांचे तांडेही दीन अशी केविलवाणी अवस्था आजच्या १ मे रोजी समाजातील निम्न स्तरावरील शोषित, वंचित वर्ग अनुभवतो आहे. त्यात कामगार आले, शेतकरी आले, उपनगरांमधील नाक्यांवर रोजगाराची वाट पाहत कपभर चहावर, भाकरी अन् तिखटावर दिवस काढणारे कष्टकरी आले आणि फक्त नोकऱ्यांच्या मागे धावणारे शहरी भागातील पदवीधर, तरूणही आले. दिवसाचा खर्चही निघत नसलेले छोटे व्यावसायिकही आले आणि भजी, वडापावच्या गाड्या लावणारेही आले.
परिस्थिती चिंताजनक आहे. नुकताच प्रसिद्ध झालेला सीएमआयईचा अहवाल हेच वास्तव सांगतो. तर असा हा महाराष्ट्र आणि राज्यभरातील कामगार वर्ग, बेरोजगार तरूण कामाची, उद्योगसमुहांची, परकीय गुंतवणुकीची वाट बघतो आहे. सोशल मीडियावर कुठलाही सणवार म्हटला की शुभेच्छांचे तुषार उमलतात पण, राज्यालाच अशी मरगळ आली आहे की महाराष्ट्र दिन उजाडला तरी आपल्या राज्याच्या निर्मितीदिनाच्या शुभेच्छा मात्र फार आवेगाने सोशल मीडियावर उमटलेल्या दिसत नाहीत. ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी १०६ जण हुतात्मे झाले त्यांचा धगधगता इतिहासही फार कुणाला स्मरणात नाही आणि नव्या पिढीतील बहुसंख्यांना त्याचे काही पडलेले नाही. महाराष्ट्र दिन म्हणजे सुट्टी, ड्राय डे असे मेसेज पाठवणाऱ्यांसमोर हा इतिहास उगाळून फायदा तरी काय?
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र त्यावेळी पेटला होता. खड्या आवाजाचे शाहीर सर्वसामान्य जनतेला ललकारत होते, चेतवत होते. पं. नेहरू, स. का. पाटील यांच्या नकारात्मक भूमिकेनंतर राज्यात जो जनक्षोभ उसळला त्यात काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष भस्मसात होण्याची वेळ आली होती. १०६ जणांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले. तेव्हा कुठे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला. संयुक्त महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरलेल्या सत्याग्रहींवर, आंदोलकांवर अंहमन्य, हेकेखोर मोरारजी देसाई गोळ्या घालण्याचे आदेश देत असतानाही लोक मागे हटायला तयार नव्हते. त्या स्फुल्लिंगांची जाणीव आजच्या पिढीला नाही. महाराष्ट्रातील, ज्या मुंबईसाठी अवघ्या राज्याने आंदोलन केले त्या मुंबईतील मराठी टक्का तर आता घटलाच आहे. यंदाच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर मतदार गणनेत दिसून आले. अनेक भागांत बाहेरच्या राज्यांतून आलेले नागरिक संख्येने अधिक आहेत. मूळ मराठी, मूलनिवासींची संख्या कमी होते आहे. कुणाला पडलंय त्याचे काही? मराठी माणसाच्या नावाने नेहमीच गळे काढणाऱ्या, मुठी आवळून दाखवणाऱ्या राजकीय पक्षांनाही त्याचे सोयरसूतक नाही. त्यांचे सारे गणित मतांशी जुळलेले आहे.
या राज्याच्या निर्मितीसाठी १९५५ ते १९६० अशा पाच वर्षांत ६८ हजार लोकांनी तुरूंगवास पत्करला होता. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारात दीडेक हजार अपंग झाले. १०६ हुतात्मे वेगळेच. त्यावेळी मराठी माणूस अन्यायाविरोधात उभा ठाकत होता. अरेला कारेने उत्तर मिळायचे. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य सर्वांच्याच नसानसांतून महाराष्ट्राभिमान रक्तासमवेत उसळ्या घेत असायचा. आज याच सर्वांची अवस्था बिकट आहे. धनदांडगे, राजकारणी मस्तीत असताना कष्टकऱ्यांचा आवाज क्षीण होतो आहे, असे खंतावणारे चित्र आहे. ज्या मुंबईसाठी एकेकाळी महाराष्ट्र लढला, भिडला तीच मुंबई वेगळी करण्यासाठी गुपचूप फुसकुल्या सोडून अंदाज घेतला जातो. महत्त्वाची कार्यालये, उद्योगव्यवसाय बिनबोभाट शेजारच्या राज्यात हलवले जातात. पण मराठी मनांना पूर्वीसारखा राग येत नाही, मुठी आवळल्या जात नाहीत. विरोधाचा कणखर आवाज उमटत नाही. सत्ताधारी पाहत असलेल्या विकासाच्या स्वप्नांसाठी, महागड्या प्रकल्पांसाठी, अनावश्यक बुलेट ट्रेन आदी पांढऱ्या हत्तींसाठी राज्याला, येथील भूमीपूत्रांना त्यांच्या घरादारांची, जमीनींची, आयुष्यभराच्या कमाईची किंमत मोजावी लागत आहे. शासकीय दमनयंत्रणेपुढे एकट्यादुकट्याचा कधीच पाड लागत नाही. अशी हजारो उदाहरणे अवतीभवती आहेत.
ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा, कर्तृत्त्वाचा, समाजसुधारणांचा वारसा लाभला आहे तेथे वर्ग-वर्णभेद उफाळळून येत आहेत. नकोशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार होऊ लागली आहे. सामाजिक सौहार्द, सलोख्याचे वातावरण विषारी होऊ लागले आहे. याचे कुणालाच काहीही वाटत नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे असे दामटून सांगताना सामाजिक खदखद दुर्लक्षिली जात आहे, शोषितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. कुपोषण, भारनियमन, दुष्काळ, शिक्षण-आरोग्यसेवेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, कर्जमाफी या समस्या सोडवण्यापेक्षा न होणारी स्मारके, गोरगरिबांना काडीचाही उपयोग नसलेले महागडे प्रकल्प याचाच वरवंटा राज्यातील जनतेच्या उरावरून फिरवला जात आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना आपला महाराष्ट्र असा दीन होत आहे ही जाणीव मन घायाळ करते आहे.”

