Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“देशातील सर्व को.-ऑप. बँकांना आरबीआयच्या देखरेखीखाली आणण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून पंजाब आणि महाराष्ट्र (पीएमसी) को.ऑप.बँकेच्या विलिनीकरणाबाबतचा निर्णय घ्यावा. बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करून खातेदारांना दिलासा देण्यात यावा, अशी विनंती जोगेश्वरी विधानसभेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना ईमेलच्या माध्यमातून पाठविलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे. ”
“पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने या बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध आणले. त्यामुळे या बँकेतील खातेदारांना स्वकष्टाचे स्वत:च्या हक्काचे पैसे काढताही येत नाही. या घोटाळ्याला आता एक वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेला अन्य बँकेत विलिनीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप कुठलाही निर्णय न घेतल्याने खातेदार हतबल झाले आहेत. या बँकेत पगारदार नोकर, निवृत्त कर्मचारी यांचे पेन्शन, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्या, उद्योजक, विधवा यांची खाती आहेत. आर्थिक निर्बंधामुळे त्यांचे हक्काचे पैसे काढणेही त्यांनी कठीण झाले आहे, असे वायकर यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. ”
“केंद्र सरकारने सप्टेंबर २०२०मध्ये बँकींग रेग्युलेशन अमेंन्डमेंट बिल २०२० लोकसभेत मंजूर केले. देशातील सर्व को.ऑप. बँकांना आरबीआयच्या देखरेखीखाली आणणे तसेच को. ऑप. बँकेतील खातेदारांचे हित जपणे हा या बिलामागील मुळे उद्देश असल्याचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत स्पष्ट केले होते. हे बिल मंजूर झाल्यानंतर पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील खातेदारांचे हितही जपले जाईल, अशी आशा आहे. परंतु अद्यापपर्यंत खालच्या स्तरावर यांची प्रभावीपणे अद्याप अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत असल्याचेही, रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान तसेच वित्तमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.”
“कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. स्वत:च्या हक्काचे पैसे असतानाही निव्वळ आर्थिक निर्बंधामुळे त्यांना सध्या अत्यंत निकडीच्या वेळी पैसे काढताही येत नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच प्रशासक खातेदारांच्या समस्या सोडवून त्यांना साधा दिलासा देऊ शकत नाही, हे खेदाने नमूद करावे लागत आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ”
“पंजाब आणि महाराष्ट्र बँकेला अन्य बँकेत विलीन करून बँकेचे दैनंदिन व्यवहार तत्काळ सुरळीत सुरू करण्यासाठी आपण स्वत: यात लक्ष घालून साकारात्मक निर्णय घेऊन खातेदारांना दिलासा द्यावा, अशी विनंती वायकर यांनी ईमेलच्या माध्यमातून पाठविलेल्या लेखी पत्राद्वारे पंतप्रधान, वित्तमंत्री तसेच आरबीआयचे गर्व्हनर यांना केली आहे.”

