Details
ना उम्र की ‘सीमा’ हो…
01-Jul-2019
”
संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]
‘तुला पाहते रे’ या टीव्ही मालिकेतील ४० वर्षांचा नायक आणि २० वर्षांची नायिका यांच्या वयातील अंतराला आक्षेप घेत ही मालिका बंद करावी, अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली गेली आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेला धक्का देणारी असल्याचे तक्रारदाराचे मत आहे. ज्या पुण्यात नानासाहेब पेशव्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी लहान वयाच्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलीसोबत विवाह करून सामाजिक नीतिमत्ता पायदळी तुडवली होती, त्या पुण्यातून अशी मागणी व्हावी, याचे आश्चर्य वाटते, हा भाग अलहिदा! असो, त्या वादात जाण्यात अर्थ नाही. मने जुळली की वयाचे अंतर गौण ठरते, हेच इतिहास सांगतो. सद्यस्थितीत वयात तब्बल १५-२० वर्षांचे अंतर असणारी अनेक दाम्पत्य सुखनैव नांदत आहेत, हे यानिमित्ताने विचारात घ्यावे लागेल……
प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांचे गायिका जसलीन मथारू हिच्यासोबतचे प्रेमप्रकरण उजेडात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात काहूर माजले होते. शिष्य-गुरूची प्रेमप्रकरणे ही भारताला नवी नाहीत. पुरातन काळापासून अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे त्यात काय विशेष नाही. अनुप जलोटा आणि जसलिन मथारू यांच्या वयात तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळेच देशभर हे प्रकरण चवीने चर्चिले गेले. यावर बरीच टीकाटिप्पणी झाली. काहीजणांनी या प्रेमप्रकरणाला तीव्र आक्षेप घेतला. वयाचे अंतर हाच या प्रकरणातील कळीचा मुद्दा होता. नंतर हे प्रकरण प्रसिद्धी स्टंट असल्याचे उजेडात आले, हा भाग निराळा. खरे तर भारतीय समाजरचनेत पती हा पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा, अशी परंपरा रूढ आहे. मात्र त्यांच्या वयात किती अंतर असावे, हे निश्चित नाही. त्यामुळे एक दोन वर्षांपासून वीस वर्षांपर्यंत वयात अंतर असलेली अनेक दांपत्य समाजात आजही नांदताना दिसतात. इतकेच की अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या वयातील अंतर या परंपरेचा कडेलोट म्हणावे लागेल. त्यामुळेच भारतीय जनतेला हे कथित प्रेमप्रकरण रुचले नाही. अर्थात हे प्रकरण अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असल्यामुळे त्यावर इतरांना बोलण्याचा तसा अधिकार नव्हता. पण अशा प्रकरणांमुळे सामाजिक वातावरण कलुषित होते, असा युक्तिवाद करत लोक त्यावर चर्चा करताना दिसतात. भारतीय राज्यघटना, शासन व्यवस्था आणि न्यायालयीन पातळीवर हा युक्तिवाद फारसा टिकत नाही, असेच अनेक प्रकरणांवरून यापूर्वीच दिसून आले आहे.
अशाच प्रकरणाची पुढची कडी म्हणजे सध्या टीव्हीवर सुरू असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या मालिकेत नायक हा चाळिशी ओलांडलेला आहे, तर नायिका अवघ्या विशीतली आहे. एका कार्यालयात काम करणाऱ्या बॉसची तिथे काम करणाऱ्या सहकारी तरुणीसोबतची प्रेमकथा यात गुंफण्यात आली आहे. त्या मालिकेच्या कथानकाची ती गरज असावी. अर्थात हा सर्व मनोरंजनाचा भाग आहे. तरीही त्याला पुण्यातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आक्षेप नोंदवत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मालिका बंद करण्याची अथवा त्याच्या कथानकात बदल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणात तक्रारदाराचा बाळबोधपणा उघड होतो. तो आपल्या तक्रारीत इतिहासाचा संदर्भ देतो. कदाचित त्यांना इतिहास अवगत नसावा. इतिहासात डोकावून पाहिल्यास अनेक राजे -महाराजे यांनी आपल्यापेक्षा कित्येक वर्षे वयाने लहान मुली वा तरुणींसोबत विवाह रचल्याचे दाखले मिळतील.
सद्यपरिस्थितीतही वयामध्ये पाच-दहा नव्हे तर तब्बल पंधरा-वीस वर्षांचे अंतर असलेली अनेक दांपत्य आपले वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत करीत आहेत. सेलिब्रेटींचा दाखला द्यायचा झाल्यास प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचे उदाहरण देता येईल. दोघांमध्ये तब्बल अठरा वर्षांचे अंतर आहे. मागील तीन दशके त्यांचा संसार विनातक्रार सुखाने सुरू आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचेही उदाहरण त्यासाठी बोलके आहे. त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल १८ वर्षे लहान असलेली शिष्या पद्मा हिच्याशी विवाह थाटला. तीस वर्षे त्यांचा संसार सुरू आहे. अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया यांचेही असेच उदाहरण देता येईल. दोघांच्या वयात तब्बल दहा वर्षांचे अंतर आहे. गेली तीन दशके ते आनंदाने नांदत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा उत्साह आजच्या नवदांपत्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील अथवा व्यापार-व्यवसाय जगतातील अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या वयातही सात-आठ वर्षांचे अंतर आहे. सचिन तेंडुलकरचे तर यापेक्षा विपरीत उदाहरण आहे. त्याची पत्नी अंजली त्याच्यापेक्षा वयाने बरीच मोठी आहे. तरीही त्यांच्या नात्यात कुठेही अंतर दिसत नाही.
अर्थात या सर्व मुद्द्यांचे समर्थन करणे योग्य की अयोग्य, हा प्रत्येकाच्या वैचारिक पातळीचा भाग आहे. तरीही आजच्या तरुणाईला वयाच्या अंतराबाबत फारसा आक्षेप दिसत नाही. काहींच्या मते लग्नाच्या वयातील अंतर हे व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या विचारानुसार बदलत असते. जोडीदारांनी एकमेकांच्या भावनांना आणि विचारांना महत्त्व दिले की वयाचे अंतर आपोआप मिटून जाते, असा व्यापक विचार करताना आजच्या तरुणी दिसतात. जिथे मने जुळतात तेथे वयाला काहीच महत्त्व नसते, असे आजच्या पिढीला वाटते. याच पिढीच्या हातात आज भारताचे सामाजिक भवितव्य आहे, त्या पिढीचे असे विचार असतील तर अशा तक्रारीला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळेच ही मालिका टीआरपीत टॉपला आहे. ही लोकप्रियता अशा मालिकांवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्यासाठी चपराकच म्हणावी लागेल.
तरीही देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण सुदृढ रहावे, यासाठी समान वयाच्या तरुण-तरुणींमध्ये प्रेमसंबंध वा विवाह जुळून यावेत, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र प्रेम किंवा विवाहाला वयाच्या अंतराचे निर्बंध घालणे संयुक्तिक ठरणार नाही. असा विचार पोसणे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे होईल. निसर्गाने मनाला स्वच्छंदपणा दिला आहे. प्रत्येक गोष्ट आवडीनिवडीचे मनाला स्वातंत्र्य दिले आहे, ते हिरावून घेतल्यासारखे होईल. प्रेम किंवा विवाह हा दोन मनांचा आणि दोन जीवांच्या मिलनाचा सुंदर क्षण असतो. या क्षणाची अनुभूती घेण्याचा प्रत्येकाला निसर्गदत्त अधिकार आहे. वयातील दहा-पंधरा वर्षांचे अंतर हे भारतातील वैवाहिक जीवनातील वास्तव आहे. ते कोणीच नाकारू शकत नाही. अर्थात अशा प्रेम किंवा विवाहसंबंधांमध्ये अनुप जलोटा आणि जसलीन यांच्याप्रमाणे निश्चितच एका पिढीचे अंतर असू नये. इतका मोठा जनरेशन गॅप त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करणारा ठरू शकतो. आचार आणि विचारांमध्ये प्रचंड तफावत निर्माण होण्याची भीती असते. जोडीदाराकडून अपेक्षाभंगाचा अनुभव येण्याची अधिक शक्यता असते. त्याचा दोघांच्या जीवनावर परिणाम होतो. शिवाय सामाजिक वातावरणदेखील त्यामुळे गढूळ होऊन जाते, हे सर्व खरे असले तरी त्याचवेळी संमतीने होणारे प्रेम वा विवाह यांच्यासाठी वयाचे निर्बंध लादण्याच्या वा तशा सिनेमा, मालिकांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या प्रवृत्तीचा अशा मार्गाने जन्म होऊ लागला तर त्या प्रवृत्ती ‘तालिबानी’ ठरतील, हेही दुर्लक्ष करून चालणार नाही.”
“संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]
‘तुला पाहते रे’ या टीव्ही मालिकेतील ४० वर्षांचा नायक आणि २० वर्षांची नायिका यांच्या वयातील अंतराला आक्षेप घेत ही मालिका बंद करावी, अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली गेली आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या सामाजिक नीतिमत्तेला धक्का देणारी असल्याचे तक्रारदाराचे मत आहे. ज्या पुण्यात नानासाहेब पेशव्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी लहान वयाच्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलीसोबत विवाह करून सामाजिक नीतिमत्ता पायदळी तुडवली होती, त्या पुण्यातून अशी मागणी व्हावी, याचे आश्चर्य वाटते, हा भाग अलहिदा! असो, त्या वादात जाण्यात अर्थ नाही. मने जुळली की वयाचे अंतर गौण ठरते, हेच इतिहास सांगतो. सद्यस्थितीत वयात तब्बल १५-२० वर्षांचे अंतर असणारी अनेक दाम्पत्य सुखनैव नांदत आहेत, हे यानिमित्ताने विचारात घ्यावे लागेल……
प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांचे गायिका जसलीन मथारू हिच्यासोबतचे प्रेमप्रकरण उजेडात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात काहूर माजले होते. शिष्य-गुरूची प्रेमप्रकरणे ही भारताला नवी नाहीत. पुरातन काळापासून अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे त्यात काय विशेष नाही. अनुप जलोटा आणि जसलिन मथारू यांच्या वयात तब्बल ३७ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळेच देशभर हे प्रकरण चवीने चर्चिले गेले. यावर बरीच टीकाटिप्पणी झाली. काहीजणांनी या प्रेमप्रकरणाला तीव्र आक्षेप घेतला. वयाचे अंतर हाच या प्रकरणातील कळीचा मुद्दा होता. नंतर हे प्रकरण प्रसिद्धी स्टंट असल्याचे उजेडात आले, हा भाग निराळा. खरे तर भारतीय समाजरचनेत पती हा पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा, अशी परंपरा रूढ आहे. मात्र त्यांच्या वयात किती अंतर असावे, हे निश्चित नाही. त्यामुळे एक दोन वर्षांपासून वीस वर्षांपर्यंत वयात अंतर असलेली अनेक दांपत्य समाजात आजही नांदताना दिसतात. इतकेच की अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या वयातील अंतर या परंपरेचा कडेलोट म्हणावे लागेल. त्यामुळेच भारतीय जनतेला हे कथित प्रेमप्रकरण रुचले नाही. अर्थात हे प्रकरण अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असल्यामुळे त्यावर इतरांना बोलण्याचा तसा अधिकार नव्हता. पण अशा प्रकरणांमुळे सामाजिक वातावरण कलुषित होते, असा युक्तिवाद करत लोक त्यावर चर्चा करताना दिसतात. भारतीय राज्यघटना, शासन व्यवस्था आणि न्यायालयीन पातळीवर हा युक्तिवाद फारसा टिकत नाही, असेच अनेक प्रकरणांवरून यापूर्वीच दिसून आले आहे.
अशाच प्रकरणाची पुढची कडी म्हणजे सध्या टीव्हीवर सुरू असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या मालिकेत नायक हा चाळिशी ओलांडलेला आहे, तर नायिका अवघ्या विशीतली आहे. एका कार्यालयात काम करणाऱ्या बॉसची तिथे काम करणाऱ्या सहकारी तरुणीसोबतची प्रेमकथा यात गुंफण्यात आली आहे. त्या मालिकेच्या कथानकाची ती गरज असावी. अर्थात हा सर्व मनोरंजनाचा भाग आहे. तरीही त्याला पुण्यातील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आक्षेप नोंदवत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मालिका बंद करण्याची अथवा त्याच्या कथानकात बदल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणात तक्रारदाराचा बाळबोधपणा उघड होतो. तो आपल्या तक्रारीत इतिहासाचा संदर्भ देतो. कदाचित त्यांना इतिहास अवगत नसावा. इतिहासात डोकावून पाहिल्यास अनेक राजे -महाराजे यांनी आपल्यापेक्षा कित्येक वर्षे वयाने लहान मुली वा तरुणींसोबत विवाह रचल्याचे दाखले मिळतील.
सद्यपरिस्थितीतही वयामध्ये पाच-दहा नव्हे तर तब्बल पंधरा-वीस वर्षांचे अंतर असलेली अनेक दांपत्य आपले वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत करीत आहेत. सेलिब्रेटींचा दाखला द्यायचा झाल्यास प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांचे उदाहरण देता येईल. दोघांमध्ये तब्बल अठरा वर्षांचे अंतर आहे. मागील तीन दशके त्यांचा संसार विनातक्रार सुखाने सुरू आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचेही उदाहरण त्यासाठी बोलके आहे. त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल १८ वर्षे लहान असलेली शिष्या पद्मा हिच्याशी विवाह थाटला. तीस वर्षे त्यांचा संसार सुरू आहे. अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया यांचेही असेच उदाहरण देता येईल. दोघांच्या वयात तब्बल दहा वर्षांचे अंतर आहे. गेली तीन दशके ते आनंदाने नांदत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा उत्साह आजच्या नवदांपत्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील अथवा व्यापार-व्यवसाय जगतातील अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या वयातही सात-आठ वर्षांचे अंतर आहे. सचिन तेंडुलकरचे तर यापेक्षा विपरीत उदाहरण आहे. त्याची पत्नी अंजली त्याच्यापेक्षा वयाने बरीच मोठी आहे. तरीही त्यांच्या नात्यात कुठेही अंतर दिसत नाही.
अर्थात या सर्व मुद्द्यांचे समर्थन करणे योग्य की अयोग्य, हा प्रत्येकाच्या वैचारिक पातळीचा भाग आहे. तरीही आजच्या तरुणाईला वयाच्या अंतराबाबत फारसा आक्षेप दिसत नाही. काहींच्या मते लग्नाच्या वयातील अंतर हे व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या विचारानुसार बदलत असते. जोडीदारांनी एकमेकांच्या भावनांना आणि विचारांना महत्त्व दिले की वयाचे अंतर आपोआप मिटून जाते, असा व्यापक विचार करताना आजच्या तरुणी दिसतात. जिथे मने जुळतात तेथे वयाला काहीच महत्त्व नसते, असे आजच्या पिढीला वाटते. याच पिढीच्या हातात आज भारताचे सामाजिक भवितव्य आहे, त्या पिढीचे असे विचार असतील तर अशा तक्रारीला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळेच ही मालिका टीआरपीत टॉपला आहे. ही लोकप्रियता अशा मालिकांवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्यासाठी चपराकच म्हणावी लागेल.
तरीही देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण सुदृढ रहावे, यासाठी समान वयाच्या तरुण-तरुणींमध्ये प्रेमसंबंध वा विवाह जुळून यावेत, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र प्रेम किंवा विवाहाला वयाच्या अंतराचे निर्बंध घालणे संयुक्तिक ठरणार नाही. असा विचार पोसणे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे होईल. निसर्गाने मनाला स्वच्छंदपणा दिला आहे. प्रत्येक गोष्ट आवडीनिवडीचे मनाला स्वातंत्र्य दिले आहे, ते हिरावून घेतल्यासारखे होईल. प्रेम किंवा विवाह हा दोन मनांचा आणि दोन जीवांच्या मिलनाचा सुंदर क्षण असतो. या क्षणाची अनुभूती घेण्याचा प्रत्येकाला निसर्गदत्त अधिकार आहे. वयातील दहा-पंधरा वर्षांचे अंतर हे भारतातील वैवाहिक जीवनातील वास्तव आहे. ते कोणीच नाकारू शकत नाही. अर्थात अशा प्रेम किंवा विवाहसंबंधांमध्ये अनुप जलोटा आणि जसलीन यांच्याप्रमाणे निश्चितच एका पिढीचे अंतर असू नये. इतका मोठा जनरेशन गॅप त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करणारा ठरू शकतो. आचार आणि विचारांमध्ये प्रचंड तफावत निर्माण होण्याची भीती असते. जोडीदाराकडून अपेक्षाभंगाचा अनुभव येण्याची अधिक शक्यता असते. त्याचा दोघांच्या जीवनावर परिणाम होतो. शिवाय सामाजिक वातावरणदेखील त्यामुळे गढूळ होऊन जाते, हे सर्व खरे असले तरी त्याचवेळी संमतीने होणारे प्रेम वा विवाह यांच्यासाठी वयाचे निर्बंध लादण्याच्या वा तशा सिनेमा, मालिकांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या प्रवृत्तीचा अशा मार्गाने जन्म होऊ लागला तर त्या प्रवृत्ती ‘तालिबानी’ ठरतील, हेही दुर्लक्ष करून चालणार नाही.”

