Details
“छोटा भाऊ, मोठा भाऊ!”
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यासाठी खास गेले होते. अमित शाह, राजनाथ सिंह अशी खासी मंडळीही होतीच. यावेळचे एक छायाचित्र दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. त्यात मोदींच्या अवतीभवती अमित शाह, राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे मात्र त्या रांगेत खोलीच्या एका कोपऱ्यात बसलेले या छायाचित्रात दिसत होते. त्यांची देहबोलीही गुमसुम अशी जाणवत होती. याच्या उलट चित्र संध्याकाळी बीकेसी मैदानावर मुंबईकरांनी पाहिले. महायुतीच्या संयुक्त सभेसाठी जमलेल्या गर्दीने पाहिले. मोदींनी आवर्जून उद्धव यांचा उल्लेख केला, त्यांना लहान भाऊ म्हटले.
कसं काय मुंबई, म्हणत नेहमीप्रमाणे मराठीत साद घातली. उद्धव यांनीही मोदी हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत, शिवसेनाच काय अख्खा मुंबई तुमच्या पाठीशी आहे, असे वचन या गर्दीच्या साक्षीने मोदींना भारावून देऊन टाकले. अर्थात हे काही खरे नाही हे मोदी आणि उद्धव दोघेही जाणतात. शिवसेना आणि भाजपा यांनी परस्परांना कचाट्यात पकडण्याचा जीजानसे प्रयत्न वारंवार केल्याचे अवघ्या महाराष्ट्राने गेली दोन वर्षे पाहिले आहे, ऐकले आहे. तरीही निवडणुका लागल्या आणि दोघांनाही एकमेकांची गरज होतीच. त्यानुसार ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्ष एकत्र आले, गळ्यात गळे घालून युतीचे पेढे परस्परांना भरवले गेले. पण विषारी, विखारी शब्दांचे जे बाण एकमेकांना विद्ध करत होते, जी अत्यंत प्रक्षोभक टीका होत होती, त्याचे काय झाले? झाले गेले गंगेला मिळाले, आम्ही समान मुद्द्यांवर, देश आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर् एकत्र आलो आहोत, असे प्रत्येक सभेत सांगितले तरी ते पटावे इतकी समोरची जनता दुधखुळी नसते. तरीही युतीचे नाटक प्रत्येक सभेत उत्तम वठवले जात आहे.
कुठेकुठे कुरबुरी असल्या तरी युतीचे घोंगडे निदान आत्ता तरी दोन्ही पक्षांनी सावरून धरले आहे. मतमोजणीपश्चात कौल पुन्हा एनडीएच्या बाजूने मिळालाच तर शिवसेना मंत्रिपदांवरून पुन्हा वाघनखं बाहेर काढणारच नाही, असे काही आता सांगता येणार नाही. किंवा भाजपा या लहान्या भावाची मानगूट धरून कोपऱ्यात भिरकावणार नाही, असेही सांगता येत नाही. यामुळेच मोदींनी बीकेसीवरील सभेत उद्धव यांचा आठवणीने लहान भाऊ म्हणून उल्लेख केल्यावर एक फर्मास कॉमेंट एका वेबसाईटवर वाचायला मिळाली – मग या लहान भावाचा गळा पुन्हा कधी आवळणार ते पण सांगा. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राज्यातील मानापमान नाट्यात शिवसेना प्रारंभी मोठा भाऊ आम्हीच म्हणून रूसून बसली होती आणि भाजपा आता आमच्या जागा अधिक तेव्हा आम्हीच मोठे म्हणत शिवसेनेला धूप घालत नव्हती. आता युतीचा नवा अंक रंगतोय तेव्हा आपोआपच मोदींकरवी उद्धवला लहान भाऊ म्हटले जातंय आणि उद्धवही मोदींना मोठा भाऊ म्हणतायत.
राजकारणात असा हिशोब चुकता होत असतो आणि तरीही प्रत्येकजण आपणच जिंकलो म्हणून मिरवत असतो. असो. मुंबईतील संयुक्त सभेत कोणी कुठल्या प्रकारे आचारसंहिता धाब्यावर बसवली ते उगाळण्यात अर्थ नाही. कारण निवडणूक आयोग आचारसंहिता भंग होतोय हे मानायलाच तयार नाही. मोदींनी त्यांच्या भाषणात पुन्हा सैन्याचा उल्लेख केला, शहीदांचा उल्लेख केला, अतिरेक्यांना घुसून मारले याचाही उल्लेख केला. कुठे काय बोलायला हवे, समोरच्या गर्दीला कसे ताब्यात घ्यायचे हे मोदींइतके दुसरे कुणीही जाणत नाही. त्यामुळे मराठीत भाषणाची सुरूवात करणाऱ्या मोदींनी प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी देशाला प्रोत्साहित करत आली असल्याचं सांगितलं. दहशतवाद्यांवरील कारवाईचा मुद्दा भाषणात आणून, मी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर दिले कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. अतिरेक्यांचा हल्ला खपवून घेणार नाही. अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारणारचं, असेही दंड थोपटले.
महाराष्ट्राच्या या मातीला शिवरायांइतके प्राणप्रिय दुसरे काही नाही, हे जाणूनच मोदींनी महाराजांनाही प्रचारात आणले हेच यातून दिसले. हेच दंड थोपटणारे मोदीसाहेब २०१४ मध्ये प्रचारात पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफगोळ्यांनी उत्तर देऊ, असे सांगत होते आणि नंतर सत्तेवर आल्यावर आताच्या निवडणुका येईपर्यंत गप्प बसले होते, जवान शहीद होत असताना तिकडे पाकिस्तानात जाऊन केक भरवत होते, हे विसरता येणार नाही. पण पब्लिक मेमरी इज शॉर्ट, असे प्रत्येक राजकारण्याला, पक्षाला वाटत असते. म्हणून तर तीच तीच टेप पुन्हा पुन्हा उगाळण्यात येते, तीच पूर्ण न केलेली आश्वासने पुन्हा नव्याने रंगवून मतदारांसमोर पेश करण्यात येतात. मध्यमवर्ग आणि युवा पिढीलाही मोदींनी या वेळी चांगलेच गोंजारले आहे. आघाडी सरकारपेक्षाही जरा अधिकच भाजपा सरकारने मध्यमवर्गाला पिळले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मध्यमवर्गाच्या खिशात हात घातला आहे. दोन पैसे खर्च करण्याची ताकद हा मध्यमवर्ग गमावून बसला आहे. त्याच्या या पिळवणुकीचे उदात्तीकरण मोदींनी उत्तम प्रकारे केले. मध्यमवर्गीयांमुळेच देश मजबूत झाला असे सांगत..
मोदींनी यावेळी देशाच्या विकासाचं संपूर्ण श्रेय मध्यमवर्गीय आणि करदात्यांना दिले. काँग्रेसने मात्र मध्यमवर्गीयांना स्वार्थी आणि लालची म्हणून हिणवल्याची टिचकीही त्यांनी वेळ साधून मारलीच. मतदानाचे तीन टप्पे आता पार पडले आहेत. चौथा टप्पा मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर आणि इतर काही मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरवेल. यातील काही ठिकाणी महायुतीचे भवितव्य डळमळीत आहे. मोदींनी बहुदा, त्यामुळेच एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार आहे, तुमचे मत काँग्रेसवर वाया घालवू नका, महायुतीलाच मत द्या, म्हणत खुंटा बळकट करून घेतला असावा.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यासाठी खास गेले होते. अमित शाह, राजनाथ सिंह अशी खासी मंडळीही होतीच. यावेळचे एक छायाचित्र दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. त्यात मोदींच्या अवतीभवती अमित शाह, राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे मात्र त्या रांगेत खोलीच्या एका कोपऱ्यात बसलेले या छायाचित्रात दिसत होते. त्यांची देहबोलीही गुमसुम अशी जाणवत होती. याच्या उलट चित्र संध्याकाळी बीकेसी मैदानावर मुंबईकरांनी पाहिले. महायुतीच्या संयुक्त सभेसाठी जमलेल्या गर्दीने पाहिले. मोदींनी आवर्जून उद्धव यांचा उल्लेख केला, त्यांना लहान भाऊ म्हटले.
कसं काय मुंबई, म्हणत नेहमीप्रमाणे मराठीत साद घातली. उद्धव यांनीही मोदी हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत, शिवसेनाच काय अख्खा मुंबई तुमच्या पाठीशी आहे, असे वचन या गर्दीच्या साक्षीने मोदींना भारावून देऊन टाकले. अर्थात हे काही खरे नाही हे मोदी आणि उद्धव दोघेही जाणतात. शिवसेना आणि भाजपा यांनी परस्परांना कचाट्यात पकडण्याचा जीजानसे प्रयत्न वारंवार केल्याचे अवघ्या महाराष्ट्राने गेली दोन वर्षे पाहिले आहे, ऐकले आहे. तरीही निवडणुका लागल्या आणि दोघांनाही एकमेकांची गरज होतीच. त्यानुसार ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्ष एकत्र आले, गळ्यात गळे घालून युतीचे पेढे परस्परांना भरवले गेले. पण विषारी, विखारी शब्दांचे जे बाण एकमेकांना विद्ध करत होते, जी अत्यंत प्रक्षोभक टीका होत होती, त्याचे काय झाले? झाले गेले गंगेला मिळाले, आम्ही समान मुद्द्यांवर, देश आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर् एकत्र आलो आहोत, असे प्रत्येक सभेत सांगितले तरी ते पटावे इतकी समोरची जनता दुधखुळी नसते. तरीही युतीचे नाटक प्रत्येक सभेत उत्तम वठवले जात आहे.
कुठेकुठे कुरबुरी असल्या तरी युतीचे घोंगडे निदान आत्ता तरी दोन्ही पक्षांनी सावरून धरले आहे. मतमोजणीपश्चात कौल पुन्हा एनडीएच्या बाजूने मिळालाच तर शिवसेना मंत्रिपदांवरून पुन्हा वाघनखं बाहेर काढणारच नाही, असे काही आता सांगता येणार नाही. किंवा भाजपा या लहान्या भावाची मानगूट धरून कोपऱ्यात भिरकावणार नाही, असेही सांगता येत नाही. यामुळेच मोदींनी बीकेसीवरील सभेत उद्धव यांचा आठवणीने लहान भाऊ म्हणून उल्लेख केल्यावर एक फर्मास कॉमेंट एका वेबसाईटवर वाचायला मिळाली – मग या लहान भावाचा गळा पुन्हा कधी आवळणार ते पण सांगा. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राज्यातील मानापमान नाट्यात शिवसेना प्रारंभी मोठा भाऊ आम्हीच म्हणून रूसून बसली होती आणि भाजपा आता आमच्या जागा अधिक तेव्हा आम्हीच मोठे म्हणत शिवसेनेला धूप घालत नव्हती. आता युतीचा नवा अंक रंगतोय तेव्हा आपोआपच मोदींकरवी उद्धवला लहान भाऊ म्हटले जातंय आणि उद्धवही मोदींना मोठा भाऊ म्हणतायत.
राजकारणात असा हिशोब चुकता होत असतो आणि तरीही प्रत्येकजण आपणच जिंकलो म्हणून मिरवत असतो. असो. मुंबईतील संयुक्त सभेत कोणी कुठल्या प्रकारे आचारसंहिता धाब्यावर बसवली ते उगाळण्यात अर्थ नाही. कारण निवडणूक आयोग आचारसंहिता भंग होतोय हे मानायलाच तयार नाही. मोदींनी त्यांच्या भाषणात पुन्हा सैन्याचा उल्लेख केला, शहीदांचा उल्लेख केला, अतिरेक्यांना घुसून मारले याचाही उल्लेख केला. कुठे काय बोलायला हवे, समोरच्या गर्दीला कसे ताब्यात घ्यायचे हे मोदींइतके दुसरे कुणीही जाणत नाही. त्यामुळे मराठीत भाषणाची सुरूवात करणाऱ्या मोदींनी प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी देशाला प्रोत्साहित करत आली असल्याचं सांगितलं. दहशतवाद्यांवरील कारवाईचा मुद्दा भाषणात आणून, मी अतिरेक्यांना जशास तसे उत्तर दिले कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. अतिरेक्यांचा हल्ला खपवून घेणार नाही. अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारणारचं, असेही दंड थोपटले.
महाराष्ट्राच्या या मातीला शिवरायांइतके प्राणप्रिय दुसरे काही नाही, हे जाणूनच मोदींनी महाराजांनाही प्रचारात आणले हेच यातून दिसले. हेच दंड थोपटणारे मोदीसाहेब २०१४ मध्ये प्रचारात पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफगोळ्यांनी उत्तर देऊ, असे सांगत होते आणि नंतर सत्तेवर आल्यावर आताच्या निवडणुका येईपर्यंत गप्प बसले होते, जवान शहीद होत असताना तिकडे पाकिस्तानात जाऊन केक भरवत होते, हे विसरता येणार नाही. पण पब्लिक मेमरी इज शॉर्ट, असे प्रत्येक राजकारण्याला, पक्षाला वाटत असते. म्हणून तर तीच तीच टेप पुन्हा पुन्हा उगाळण्यात येते, तीच पूर्ण न केलेली आश्वासने पुन्हा नव्याने रंगवून मतदारांसमोर पेश करण्यात येतात. मध्यमवर्ग आणि युवा पिढीलाही मोदींनी या वेळी चांगलेच गोंजारले आहे. आघाडी सरकारपेक्षाही जरा अधिकच भाजपा सरकारने मध्यमवर्गाला पिळले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मध्यमवर्गाच्या खिशात हात घातला आहे. दोन पैसे खर्च करण्याची ताकद हा मध्यमवर्ग गमावून बसला आहे. त्याच्या या पिळवणुकीचे उदात्तीकरण मोदींनी उत्तम प्रकारे केले. मध्यमवर्गीयांमुळेच देश मजबूत झाला असे सांगत..
मोदींनी यावेळी देशाच्या विकासाचं संपूर्ण श्रेय मध्यमवर्गीय आणि करदात्यांना दिले. काँग्रेसने मात्र मध्यमवर्गीयांना स्वार्थी आणि लालची म्हणून हिणवल्याची टिचकीही त्यांनी वेळ साधून मारलीच. मतदानाचे तीन टप्पे आता पार पडले आहेत. चौथा टप्पा मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर आणि इतर काही मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरवेल. यातील काही ठिकाणी महायुतीचे भवितव्य डळमळीत आहे. मोदींनी बहुदा, त्यामुळेच एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार आहे, तुमचे मत काँग्रेसवर वाया घालवू नका, महायुतीलाच मत द्या, म्हणत खुंटा बळकट करून घेतला असावा.”

