Details
ईशान्येत काटे कोणाकडे?
28-Apr-2019
| 0
”
अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
बहुभाषिक मतदारसंघ अशी ओळख असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात आता नाराजीचे किरीट काटे कोणाच्या पथ्यात पडतात हे महत्त्वाचे आहे. एकीकडे गुजराती तर दुसरीकडे दलित मुस्लिम आणि मराठी मतेही येथील जातीय ध्रुवीकरणाची बलस्थाने आहेत. त्यामुळे ज्या उमेदवाराला हे गणित सोडवता येईल तो परीक्षा पास होईल. या मतदारसंघात मुलुंड घाटकोपर पूर्व आणि पश्चिम तसेच विक्रोळी, भांडुप आणि मानखुर्द हे मतदारसंघ येतात. मुलुंड आणि घाटकोपर हे गुजरातीभाषिक मतदारसंघ असलेतरी येथे मराठी मतदारसुद्धा आहेत. आजघडीला या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेच्या अधिपत्याखाली असलेल्या याठिकाणी मनसे ला मानणारा मोठा वर्ग आहे. मानखुर्द-गोवंडी हा मुस्लिम आणि दलितभाषिक असलेला मतदारसंघ समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहे. आता गेल्या काहो दिवसांत येथे झालेल्या संगीत मानापमान नाटकाचा विचार केला तर विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून भाजपने मनोज कोटक यांच्या गळ्यात उमेदवारीचे उपरणे टाकले. यामागे शिवसेनेचा प्रखर विरोध कारणीभूत ठरला. गेली चार वर्षे सेनेविरोधात मोठी आघाडी किरीट सोमय्या यांनी उघडली होती. थेट बांद्रा आणि माफिया असा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे संतप्त शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही अशी धमकी दिली. परीणामी कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेने भाजपबरोबर युती केली असली तरी त्याचे मतांमध्ये इथे किती परावर्तित होते हे महत्त्वाचे आहे. कारण, मनसे फॅक्टर कळीचा मुद्दा ठरू शकतो.
गेली काही दिवस राज ठाकरे यांनी जी भूमिका घेऊन पोलखोल सुरू केली आहे त्याचा थेट परिणाम शक्य आहे. गुजराती समाज एकगठ्ठा मते पडूनसुद्धा कोटक यांना अन्यत्र मतांची बेगमी करावी लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे संजय दीना पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी मुस्लिम आणि दलित मतांची बेगमी करण्यासाठी मानखुर्द, गोवंडी परिसरात आधीच फिल्डींग लावून ठेवली असल्याचे चित्र आहे. त्यात त्यांना मनसेची मते मिळाली तर येथे धक्कादायक निकाल लागू शकतो. उमेदवारी जाहीर होतानाच पाटील यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली होती. सेना भाजपच्या बेगडी प्रेमाचे वाभाडे काढणाऱ्या अनेक चित्रफिती सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. कोटक यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. सोमय्या हा गट मनातून नाराज असला तरी प्रचारात दिसत आहे. ते कार्यकर्ते काय करतात हेसुद्धा निर्णायक ठरणार आहे. कोटक हे पक्षीय आमदारांच्या बलाबलाचा विचार करता वरचढ दिसत असले तरी येथे जातीय ध्रुवीकरण झाल्यास धक्कादायक निकाल लागू शकतो.
आमचं ठरलंय, पण कोणासाठी?
आधी यंत्रमाग आणि आता धुळीचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे आमचं ठरलंय, अशी एक टॅगलाईन समाज माध्यमातून फिरत असल्याने नेमके कोणासाठी आणि काय ठरलंय हे गुलदस्त्यात आहे. 2014 च्या मोदी लाटेत अचानक एके दिवशी राष्ट्रवादीचे घड्याळ फेकून देऊन कपिल पाटील यांनी कमळ हातात घेतले आणि निवडूनसुद्धा आले. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला, पण भाजपचा खासदार झाला आणि शिवसेनेसोबत कुरघोडीचे राजकारण करताना पाटील यांचे शत्रू मोठ्या प्रमाणात तयार झाले. पक्षवाढीसाठी हे करताना त्यांनी काही विकासात्मक आणि रचनात्मक कामे करण्याचा प्रयत्न केला. पण त्याची राजकीय नोंद झाली नाही. सध्या युतीमध्ये असलेल्या शिवसेनेसोबत दोन हात केल्यामुळे सेनेत पाटील यांच्याबाबत आजही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यातच युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. परिणामी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. नंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. पण कोणाला पाठिंबा देणार हे सस्पेन्स अद्याप कायम आहे. नाराज शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची समजूत काढण्याचा आटापिटा पालकमंत्री एकनाथ शिंदे करत असूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
दुसरीकडे काँग्रेसमध्येसुद्धा आनंदीआनंद आहे. सुरेश टावरे याना उमेदवारी दिली आणि कुणबी समाजाचे विश्वनाथ पाटील वर्षावर दाखल झाले. पाटील यांचे कुणबी समाजावरील वर्चस्व किती आहे हे वादातीत आहे. त्यांनी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमचं ठरलंय.. असे मेसेज सुरू केल्याने नेमके काय ठरलंय हे समजत नाही. वंचितचे अरूण सावंत रिगणात आहेत. सुशिक्षित आणि स्वच्छ व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. दलित आणि मुस्लिम समाजाची ते किती मते खेचतात त्यावर बरेच अवलंबून आहे. या मतदारसंघात सुमारे चार ते साडेचार लाख मुस्लिम समाजाची मते आहेत. ती कोणाकडे वळतात तसेच आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठी तर युतीमधील शिवसेना-भाजपसाठी मनापासून किती साथ देतो यावर विजयाचा हिशेब लागणार आहे.”

