कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा अशी एक गोष्ट आहे. तशाप्रकारे धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. नैराश्याचे भाव स्पष्ट दिसत होते. एक विश्वास गमावलेला विरोधी पक्ष समोर दिसत होता. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. कोणताही विकासाचा अजेंडा नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवारदेखील ते अजूनपर्यंत जाहीर करू शकले नाहीत. केवळ एकमेकांकडे बोट दाखवतात. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, त्यांचा द्वेष करणे हा एकमेव अजेंडा असल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून दिसत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेची खिल्ली उडवली.
ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे. सत्तेतून हद्दपार केलेले आहे अशा इंडिया आघाडीच्या तडीपार नेत्यांची ती सभा होती. २०१४पूर्वी याच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून हिणवले होते. आज देशाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. या सभेमधून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एक नवीन गोष्ट घडली. ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब भाषणाची सुरुवात करताना ज्याप्रकारे ‘माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो’ या शब्दांनी भाषणाची सुरुवात करायचे. ते शब्ददेखील उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना गाळले. यावरून त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना आणि धोरणांना कायमची तिलांजली दिल्याचे दिसून आले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला. स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या स्टालिनसारख्या लोकांसोबत एकाच मंचावर बसावे लागले, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची माफी मागायला हवी, असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले. कालच्या सभेमध्ये बोलायला उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे देण्यात आली. यातच आता त्यांची पत काय हे दिसून येते. आमदार, खासदार सारे सोडून गेल्यानंतर अशीच गत होणार, असेही शिंदे म्हणाले.
आपल्या भाषणामध्ये विरोधक आम्हाला डीलर म्हणाले. मी म्हणतो हो, आम्ही खरंच डिलर आहोत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्येष्ठ, तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले. मोदींच्या काळात एकही घोटाळा बाहेर आला नाही. पहिल्या कॅबिनेटपासून ते शेवटच्या कॅबिनेटपर्यंत 500 निर्णय घेतले. एक पॉझिटीव्हीटी आणण्याचं काम आम्ही केलं आहे. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नक्की होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. केंद्राने आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील आम्हाला भरभरून पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.