इशान्येकडील राज्यात आसाममधील सत्तासंघर्ष नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. आसामध्ये येत्या नऊ एप्रिल या एकाच दिवशी १२६ जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत असून भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी अटतटीची लढत बघायला मिळेल असे वातावरण आहे. हिंदु-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणातून भाजपा पुन्हा एकदा सत्ता संपादन करील का? या प्रश्नांभोवती निवडणूक लढवली जात आहे. राज्यात २ कोटी ४९ लाख मतदार आहेत. मतमोजणी ४ मे रोजी आहे.
सन २०१४मध्ये नरेंद्र मोदी या दिग्गज नेत्याचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाल्यापासून आसाममधील आसाममध्येही भाजपाला अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागले. देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा आसाममध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव मोठा असुनही हिंदू व्होटबँक आपल्या पठिशी एकत्रित उभी करण्यात भाजपाला मोठे यश लाभले. मतांच्या ध्रुवीकरणातून आसाममध्ये भाजपाचे कमळ फुलले. सन २०१६मध्ये भाजपाने आसाममध्ये सत्ता काबीज केली व २०२१मध्ये मित्रपक्षांच्या मदतीने एनडीएने सत्ता आपल्याकडे कायम राखली. आता २०२६मध्ये मतांच्या ध्रुवीकरणाची रणनिती भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देईल का, हा सर्वात मोलाचा प्रश्न आहे. सन २०२१मध्ये भाजपाने विधानसभेच्या ९३ जागांवर निवडणूक लढवली होती व ६० जागांवर विजय मिळवला. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला या निवडणुकीत एकूण ७५ जागा मिळाल्या होत्या. भाजपाने दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. पण सन २०१६च्या निवडणुकीच्या तुलनेने २०२१मध्ये जागा कमी मिळाल्या. यंदा २०२६मध्ये भाजपा आसाममध्ये सत्ता मिळविण्याची हॅटट्रीक संपादन करणार का?
आसामच्या निवडणुकीत विकासासाठी आश्वासनांची खैरात होत आहे, हिंदु मतदारांना भाजपा आकर्षित करीत आहे आणि सरमा की गोगोई अशी नेतृत्त्वाची चुरसही बघायला मिळत आहे. आसामवर काँग्रेसने दीर्घकाळ सत्ता उपभोगली. पण, गेली दहा वर्षे या पक्षाला विरोधी बाकांवर बसण्याची पाळी आली. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०२१मध्ये काँग्रसने विधानसभेच्या ९५ जागा लढवल्या होत्या व केवळ २९ मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आले. काँग्रसच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या महाज्योत आघाडीला ५० जागा मिळाल्या, ही संख्या २०१६च्या निवडकीपेक्षा जास्त होती. त्यामुळेच २०२६च्या निवडणुकीत भाजपाकडून सत्ता खेचून घेता येईल अशी आशा काँग्रेसला वाटते आहे.

यंदाच्या निवडणुकीत आघाडी आणि युतीची समीकरणे बदललेली आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर ऑल इंडिया युनायटेड फ्रंटने समझोता केला होता, यावेळी ही फ्रंट काँग्रेसबरोबर नाही. एआययूडीएफबरोबर कोणताही समझोता केलेला नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. यंदाच्या निवडणुकीत आणखी एक वेगळेपण म्हणजे, आसाम सोनमिलितो मोर्चा नावाची नवीन आघाडी मैदानात उतरली आहे. या आघाडीत आसाम जातीय परिषदसारखे अनेक प्रादेशिक पक्ष सामील झाले आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड फ्रंटबरोबर समझोता केल्याने मुस्लिम धार्जिण्या फ्रंटशी काँग्रेसने हातमिळवणी केली म्हणून अनेक ठिकाणी हिंदू मतदार काँग्रेसपासून दुरावले व हिंदू व्होट बँकेतून भाजपाला भरभरून मतदान झाले. गेल्यावेळी झालेली चूक काँग्रेसने यावेळी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा लाभ किती होईल हे मतदानानंतर स्पष्ट होईल.
आसाम गण परिषद हा भाजपाचा जुना मित्र पक्ष आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने अगपला २२ जागा सोडल्या होत्या. पण अगपला केवळ नऊ जागांवरच विजय मिळाला होता. त्यामुळे मित्रपक्षांबरोबर जागावाटप करताना भाजपाने शेवटपर्यत सावधानता बाळगली होती. आसामच्या राजकारणात बोडो लँड टेरेटोरिअल रिजनमधील १५ जागा निर्णायक ठरू शकतात. या प्रदेशावर जात व प्रादेशिक अस्मितेचा प्रभाव जास्त आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने बोडो लँड पीपल्स पार्टीला मित्रपक्ष म्हणून बरोबर घेतले आहे. जागावाटप समझोत्यानुसार बोडो लँड पीपल्स पार्टी ११ व भाजपा ४ जागांवर लढत आहे.
गेल्या निवडणुकीत बोडो लँड पीपल्स पार्टीने काँग्रेसबरोबर समझोता केला होता, यंदा त्यांनी काँग्रेसला दूर करून भाजपाशी जमवून घेतले आहे. गेल्यावेळी भाजपाने युनाटेड पीपल्स पार्टीबरोबर समझोता केला होता. गेल्या वर्षी झालेल्या बोडो लँड टेरिटोरिअर कौन्सिलच्या निवडणुकीत बोडो लँड पीपल्स पार्टीने यश मिळवल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपाला या पक्षाबरोबरच समझोता करणे उचित ठरेल असे वाटले. जो विजय मिळवून देऊ शकेल त्याच्याबरोबरच युती करायची असे भाजपाचे धोरण आहे. बोडो क्षेत्रात नुकसान झाले तर बहुमताच्या खेळात सत्ता हातून निसटेल अशी भाजपाला भीती वाटते.

आसाममध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत हिमंत बिस्व सरमा हेच भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील हे उघड आहे. काँग्रेसने गौरव गोगोई यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले नसले तरी गोगोई यांचाच प्रमुख नेता म्हणून चेहरा समोर ठेऊन काँग्रेस निवडणूक लढवत आहे. गोगोई जोहरट मतदारसंघातून तर सरमा त्यांच्या पारंपरिक जालुकबाडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून सरमा सन २००१पासून निवडून येत आहेत. आसाममधील निवडणूक ही केवळ दोन पक्षातील वर्चस्वासाठी नाही तर सरमा विरूध्द गोगोई अशा नेतृत्त्वाची आहे. ५७ वर्षांचे सरमा हे आक्रमक नेतृत्त्व आहे तर ४३ वर्षांचे गोगोई यांचा स्वभाव शांत व संयमी आहे. सरमा मूळचे काँग्रसचे. सन २०१५मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. आसाममध्ये भाजपाच्या झालेल्या विस्तारात त्यांचा वाटा मोठा आहे. गौरव गोगई यांचे वडिल तरूण गोगोई आसामचे तीन टर्म मुख्यमंत्री होते.
सरमा यांच्या नेतृत्त्वाखालील आसाममधील भाजपा सरकारने निवडणुकीच्या काही दिवस अगोदर अरूणोदय ३ ही योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील चाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात सरकारने थेट नऊ हजार रूपये जमा केले आहेत. निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन भाजपा सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी सरकारी खजिन्यातून पणाला लावले आहेत. राज्यात महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांच्या बरोबरीने आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेने भाजपाला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले, तोच पॅटर्न देशातील दिड डझन राज्यात सत्ताधारी पक्षांनी राबवायला सुरूवात केली आहे. आसाममध्येही अरूणोदय योजनाच भाजपाला हॅटट्रीक मिळवून देईल असा विश्वास पक्षाला वाटतो आहे.
काँग्रेसने भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारावर निवडणूक प्रचारात टीकेची झोड उठवली आहे. मोठमोठ्या उद्योगसमुहांना दिलेल्या जमिनी आणि मोठ्या कामांचे ठेके यात संघटीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने सरमा सरकारवर भ्रष्ट कारभाराचे जनतेचे आरोपपत्रच ठेवले आहे. सरकारी साधनसामुग्रीचा कसा गैरवापर केला गेला आहे याची यादीच आरोपपत्रात मांडली आहे. प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग याचा संशयास्पद झालेला मृत्यू हासुद्धा निवडणुकीत मुद्दा बनला आहे. मुख्यमंत्री सरमा अनेकदा बंगालीभाषिक मुस्लिमांचा उल्लेख मियां मुसलमान असा करतात. आसाममधील अतिक्रमणांवर झालेली कारवाई हासुद्धा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. राज्यातील सहा स्थानिक जातीसमुहांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक भागात प्रचाराचा केंद्रबिंदू बनली आहे. पाहूया काय होते ते!

