लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या जागा कुणी लढवाव्यात यावर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली असून लवकरच यावर पुढची चर्चा आघाडीतले प्रमुख पक्ष तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या लहानसहान पक्षांबरोबरही केली जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
दरम्यान लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका होतील. एकदा निवडणुका लागल्यावर धावपळ व्हायला नको म्हणून आतापासूनच तयारी करण्याची चर्चा कालच्या या बैठकीत झाली. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी ही बैठक बोलावली होती. २०१४पासून कालच्या कर्नाटकाच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात दोनवेळा सरकार आणि वेगवेगळ्या राज्यात सरकारे आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये उत्साह पाहयला मिळायचा. यामुळे विरोधक नाऊमेद झाले होते. १३ मे रोजी कर्नाटकचा निकाल आला आणि एक्झिट पोलचे अंदाजही चुकले. काँग्रेसने १३५पर्यंत मजल मारली. त्यामुळे विरोधकांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहयला मिळाला. त्यामुळे पुढची लाईन ऑफ एक्शन काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीने राहिलेल्या वज्रमूठ सभा झाल्या पाहिजेत यावर चर्चा झाली. याशिवाय मागच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करुन निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडी करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकांतील जागावाटप म्हटल्यावर तिन्ही पक्ष नावे देणार आहेत. त्यातून बैठक होईल. त्यासाठी तिन्ही पक्षातील दोघेजण अशी सहा जणांची समिती स्थापन करून पुढच्या लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप कसे करायचे हे ठरवले जाईल. याशिवाय फक्त तीनच पक्ष नाही तर या तिन्ही पक्षांशी संबंधित मित्रपक्ष आहेत. त्यांनाही जागावाटपात बरोबर घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अकोला येथील घटनेत सोशल मीडियामध्ये काही क्लिप व्हायरल झाल्या. त्यामध्ये काही समाजाच्या भावना दुखावणारी घटना होती. त्यातून एक ग्रुप आक्रमक झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे. वास्तविक राज्यसरकारने या गोष्टींना आवर घातला पाहिजे. कुणी क्लिप व्हायरल केली याची शहानिशा केली पाहिजे. अलीकडे सायबर गुन्हे वाढले आहेत. अशावेळी तपासयंत्रणांच्या हातात खूप काही बाबी असतात. ही क्लिप कुणी व्हायरल केली, यामागे मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता, या सर्व खोलात तातडीने गेले पाहिजे. हे एका ठिकाणी झाले उद्या ते दुसरीकडे होऊ शकते. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस यंत्रणेकडे असते. पोलीस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप न होता अशा प्रकारच्या चौकशा पूर्ण करण्यासाठी मुभा दिली तर पोलीस यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करू शकते, असेही अजित पवार म्हणाले.

