लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काहीही फरक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. (आज सायंकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशही झाला.) लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख १६ एप्रिल आहे. सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील असे शरद पवार यांनी सांगितले. शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील येत्या २६ एप्रिलला पक्षात प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले.
भाजपानं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा पुरोगामी गांधी, नेहरू यांच्या विचारांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. या जिल्ह्याचा इतिहास बघितला तर येथील महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील पाटील हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्री आहे. मागील निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. चार जागा राष्ट्रवादीला, एक जागा काँग्रेसला आणि एक जागा एमआयएमला मिळाली होती. हे पाच-सहा जागांचे चित्र यंदा कितीतरी पटीने वाढलेले असणार आहे. भाजपाने ४०० पारच्या ऐवजी ५४३चा आकडा सांगणे योग्य होईल असे म्हणत त्यांनी ४०० पारच्या घोषणेची खिल्ली उडवली.

