भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशावर दोनशे पस्तीस लाख कोटी रुपये कर्ज असून पाच ट्रिलियन डॉलरचे मृगजळ दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात देशाची आर्थिक परिस्थिती अतीशय भयानक आहे. देशातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत नमूद केले.
तीन दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेची सांगता अर्थतज्ज्ञ उटगी यांच्या ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे का?’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. सुमारे दोन तास त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांतील अर्थव्यवस्था आणि त्यात होणारे चढउतार समजावून सांगताना सहकारी बँका केंद्र सरकारने तसेच रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयांमुळे कशा डबघाईस आल्या, कशा बुडाल्या, संचालक मंडळ दोषी धरण्यात आले, परंतु रिझर्व्ह बँक अधिकारी कसे बेमालूम सटकले, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारख्यांनी अर्थव्यवस्थेला कसा चुना लावला आणि सामान्य, मध्यमवर्गीय कसा नाडला जातोय, ही संपूर्ण परिस्थिती सांगितली.
पक्ष कोणताही सत्तेवर येवो, मग तो कॉंग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष या परिस्थितीला जबाबदार आहे. राजकारण महत्त्वाचे नाही, अर्थकारण महत्त्वाचे आहे. हे अर्थकारण बिघडले तर पाच ट्रिलियन डॉलरची घोषणा निव्वळ घोषणाच राहते. मध्यमवर्गीय माणसाला बसायचा तो फटका बसतोच. दहा टक्के मूठभर लोकांच्या भल्यासाठी एकशे चाळीस कोटी नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण न्यायालयात जाऊन अनेक प्रकरणी लोकांना न्याय मिळवून दिला असल्याचा दावासुद्धा विश्वास उटगी यांनी यावेळी केला.