मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
असल्या घटना राज्यात सातत्याने वाढत आहेत. याबद्दल सरकार कठोर भूमिका का घेत नाही? आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडतात. मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मुलींना, मुलांना, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र असे घडताना दिसत नाही. याला पोलीस आणि सरकार जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला.
वसतीगृहात वास्तविक त्या नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कसे नेमण्यात आले? यामध्ये वस्तुस्थिती काय आहे, कितीजणांनी हे कृत्य केले आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ही झालेली घटना लक्षात घेऊन राज्यात जिथे-जिथे वसतीगृहे आहेत तिथे सुरक्षेची व्यवस्था नीट आहे का याची माहिती घ्यावी. या घटनेचा तपास ज्यांच्याकडे आहे त्यांनी ताबडतोब खोलवर जाऊन धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि कोण जबाबदार आहे याचा छडा लावला पाहिजे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

