कितीही शाह आणि अफजलखान येऊ द्यात. आपल्या घरात येऊन फोडाफोडी करताहेत. सत्तेची मस्ती आहे. तुमचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. जा मणिपूरमध्ये.. अमित शाहांनी जाऊन काय केले? मोदी अमेरिकेत जातायत.. मग मणिपूरला का जात नाही? युक्रेन युद्ध थांबवले ही भाकडकथा आहे. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
उद्धव ठाकरेंच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर आज मुंबईत झाले. त्यावेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निवडणुकीचे वर्ष सुरू झालेले आहे. पैसा येईल. त्यावेळचा गॅसचा भाव, आताचा भाव… विचारा जनतेला. महागाई, बेरोजगारी किती वाढली? अनेक योजनांचे फोटो.. आता झाडाझडती घ्या. दहा वर्षे हा काळ मोठा आहे. माझा उलटा प्रश्न आहे. जी देशाची वाट लागली आहे, त्यापेक्षा अधिक कोण वाट लावू शकतो? भाजपाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हिटलरच्या वाटेवर भाजपा आहे. आपले काम आहे क्रांतिकारकांची शपथ घेऊन पुढे जायचे आहे. इंग्रजांनासुद्धा जावे लागले. इंग्रजपण गुर्मीत होते. भाजपा आव्हान नाही. पण जे पायंडे पाडताहेत ते आव्हान आहे, असेही ते म्हणाले.
कागदावर माझ्याकडे काहीच नाही. ना चिन्ह ना नाव. तुम्ही रक्ताची पाणी केले ते लाचार मिंधे पलिकडे गेले. तरीदेखील तुम्ही सोबत आहात. तुमची साथ महत्त्वाची. सुखात सोबत असणारे रिश्ते आणि दुःखात सोबत असतात ते फरिश्ते. मुद्दाम अयोध्येला व्यासपीठावर बोलावले. यापुढे माता-भगिनीवर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवू नका, असे ते म्हणाले.
मी २३ तारखेला पाटण्याला जातोय. पूर्वी भाजपाचे लोक यायचे. आता भाजपा सोडून सगळे येताहेत. भाजपेतर एकत्र येणार आहेत. ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे. फडणवीसांची अवस्था सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. सावरकरांनी हालअपेष्टा मोदी, शाह, फडणवीसांसाठी भोगल्या नव्हत्या. आमचा एकच बाप… तुमचे किती? असा सवाल त्यांनी केला.
हिंदू आहोतच आम्ही. तुम्ही ढकलले म्हणून आम्ही गेलो. अमित शाहांना प्रश्न विचारले तर बोबडी वळते. ३७०ला आमचा पाठिंबाच. पण अजूनही तेथे निवडणुका घेऊ शकत नाही याचे उत्तर द्यावे. तिथला हिंदू सुरक्षित नाही, अजूनही काश्मिरी पंडित परतलेला नाही. मणिपूरला काय गोमूत्र शिंपडणार आहात? आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व तोच वारसा आम्ही समोर नेतोय. गोमूत्र, शेंडी जानवे, केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू आम्हाला मान्य नाही. देशासाठी लढणारे सगळे हिंदू आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दार आईच्या कुशीवर वार करुन गेले आहेत. कुणीही देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही. देश सर्वोच्च. मोदींचा देश.. मग इतरांचा देश नाहीए. आमची ओळख भारतमातेचा पुत्र म्हणून व्हायला हवी. हिंदुस्थान ही ओळख मोठी.. पंतप्रधान उद्याही होतील. अगोदरही होते. पाठ्यपुस्तक मंडळाने राजीनामे दिले कारण त्यांनी मान्य केलेली पुस्तके नाहीत. इतिहास बिघडवणारे तुम्ही… आम्ही इतिहास घडविणारे… असेही ते म्हणाले.

