माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करून आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत केली.
मराठा आरक्षणाच्या विषयावरून झालेल्या चर्चेच्या वेळी सोळंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार आरक्षण देतील, हा विश्वासही व्यक्त केला. तसेच, सरकारने हे आरक्षण देताना सामाजिक सलोखा कायम राहील, हे बघावे आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन केले.

मराठा आरक्षणाच्या विषयारून ३० ऑक्टोबरला निघालेल्या मोर्चातून माजलगावमध्ये माझ्या घरावर दोन तास दगडफेक करून जाळपोळ केली गेली. त्यात एकूण लोक दोन ते तीन हजार असले तरी हल्लेखोर दोनशेच होते. तेही नावावर गुन्हे असलेले समाजकंटक आणि काही राजकीय विरोधकही होते. पण सीसीटीव्ही फूटेज असूनही त्या घटनेशी संबंधित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप बीड माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत केला.
माझ्या घरावरील हल्ल्याला चाळीस दिवस झाले पण लोकप्रतिनिधींची घरेदारे जाळायची, कुणाची हॉटेल जाळायची, यामागे कुणीतरी सूत्रधार असला पाहिजे. काही राजकीय नेतेमंडळींनी पोळी भाजून घेतली असेल पण खऱ्या सूत्रधारापर्यंत पोलीस जात नाहीत, तोवर उपयोग होणार नाही. हिंसक दंगली बीडमध्ये घडल्या, त्यादिवशी अनेक घटना घडल्या. भाजपाचे कार्यालय, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला, माझ्या लहान बंधूंच्या घरावर हल्ला झाला. मग हे इंटेलिजन्सचे अपयश आहे का… पोलिसांनी माझ्या घरापाशी हल्ले होताना बघ्याची भूमिका का घेतली… हे सर्व प्रश्न आहेत. अनेक लोकप्रतिनिधींच्या मनात भीती आहे की असेच हल्ले आमच्या घरावर झाले तर काय करायचे… त्यामुळे यानिमित्ताने निश्चितपणाने गृहमंत्री फडणवीस यांना विनंती करायची आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी, एव्हढीच मागणी करतो, असेही सोळंके म्हणाले.

