Homeमाय व्हॉईसवरळीत वाहून गेलेली...

वरळीत वाहून गेलेली मेट्रोची भिंत सिमेंट काँक्रिटची नव्हतीच!

गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोचे वरळी स्थानक वाहून गेल्याचे प्रमुख कारण आहे भेसळयुक्त सिमेंटचे काम! पावसाचे वा गटाराचे पाणी स्थानकात शिरू नये म्हणून बांधण्यात आलेली भिंतच मुळी सिमेंट काँक्रिटने बांधलेली नव्हती अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे. शोभेसाठी फॉल्स सिलिंग बनवतात त्या जिप्सम नावाच्या पदार्थाने बनवली होती असे एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माझ्याशी बोलताना सूचित केले. हे जिप्सम पाणी लागले की लगेचच विरघळते व याच कारणामुळे मेट्रोच्या कंत्राटदाराने बांधलेली भिंत मुसळधार पावसामुळे वाहून गेली व स्थानकात पाण्याचा लोंढा घुसला. सिमेंटऐवजी जिप्सम वापरल्याप्रमाणे जसा हा गंभीर अपघात घडला तसेच दिल्लीतील एका अति ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या घाईमुळेही बांधकामाची ‘गुणवत्ता’ तपासायला पुरेसा वेळ न मिळाल्यानेच कालचा प्रसंग ओढवला अशी पुस्तीही या अधिकाऱ्यांने जोडली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा सरकारने जर निर्णय घेतला तर घाई करणाऱ्या या अधिकाऱ्याची मुख्यमंत्री चौकशी करतील काय असा प्रतिप्रश्नही या अधिकाऱ्याने विचारला.

‘ध्यानमे है ना बडे साब आने वाले है.. यह दिन गया तो साब बाहर जानेवाले है..’ असा तगादा दिवसाआड लावल्याने पद्धतशीर काम करण्याचे वेळापत्रकच डगमगले. कारण मेट्रोच्या कामासासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची गुणवत्ता पारखली जाते. त्या निकषात जर ती वस्तू बसत नसेल तर ती वस्तू बाद केली जाते, असा सर्वसाधारण नियम असतो. जोरदार पावसामुळे मेट्रो स्थानक बंद करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर गेले दीड-दोन दिवस मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी बैठकांचा सपाटा लावलेला आहे. दिवसरात्र या चर्चा सुरु असून सरकारला कोणी सामोरे जायचे याचा गांभीर्याने विचार सुरु आहे. परंतु इतक्या गंभीर प्रकारबाबत हा मजकूर लिहून संपेपर्यंत तरी अधिकृत खुलासा केला गेला नव्हता.

दरम्यान वरळीच्या या मेट्रो स्थानक परिसरात फेरफटका मारला असता बरेच काम बाकी असल्याचे दिसून आले. स्थानक परिसरातील पोलिसांनी बंद दरवाजाचा फोटो घेण्यासही मनाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांनी काही केले नाही. दरवाजा बंद आहे, मी आत जाऊन तर फोटो काढीत नाही ना? मी रस्त्यावर उभा राहून फोटो काढत आहे. मग त्याला मनाई कशाला? एक हवालदार तर माझ्याजवळ येऊन उभा राहिला होता. मनात विचार आला की जोरदार पावसात वरळी, सात रस्ता, मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आदी ठिकाणी तर वरळीपेक्षाही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. मग तेथील भुयारी मेट्रोचे काय होईल? बांधकाम सूरू असलेली ही स्थानके बाहेरून पाहिली असता तेथेही परिस्थिती चांगली नसल्याचे दिसून आले.

‘When a train goes through a tunnel and gets dark you don’t thrown away the ticket and jump off. You sit still and thank the the engineer’ हे जरी कितीही खरे असले तरी भुयारी रेल्वेस्थनकात पाणी शिरले ही जनसामान्यांना घाबरवून सोडणारीच घटना आहे, हे विसरता येत नाही. एक आवर्जून सांगावसं वाटतंय की, उगाचच मेट्रोच्या कामकाजावर काहीबाही बोलण्याचा प्रकार कुणी करू नये. अशासाठी ही नोकरदार मंडळी आहेत. वरून जसे आदेश येतात तसे त्यांना काम करावेच लागते आणि नाही ऐकले तर राजकीय नेते नोकरदार मंडळींचे काय हाल करतात हे आपल्या सर्वाना माहित आहेच. जाता जाता एका अधिकाऱ्याची बदली केली जाते. बदलीबाबत काही तक्रार नाही. कारण बदली हा सरकारी नोकरीचा भागच आहे. परंतु बदली झाल्यावर त्या व्यक्तीचा चारपाच महिने पगारच काढला जात नाही, हा अन्याच नव्हे काय? ‘She had a penny tarting sort of laugh rather like train goes into tunnel’ हेही सर्वांनी लक्षात ठेवलेले बरे!

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content