Homeन्यूज अँड व्ह्यूजजगाचा दहा टक्के...

जगाचा दहा टक्के प्राणवायू धोक्यात..

आजच्या जगात तुम्हाला वारंवार धाप लागल्यासारखी किवा एकूणच थकल्यासारखे वाटते आहे का? तसे असेल तर त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्याभोवती जे हवेचे संरक्षण निसर्गाने दिले आहे त्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आहे, असे जागतिक स्तरावर बोलले जात आहे. यासाठीची कारणे थेट प्रदूषणापासून तो प्लास्टिकच्या उत्पादनातील रसायने समुद्रात सोडली जातात इथपर्यंत दिली गेली आहेत. मुद्दा एकच आहे आणि तो असा की, प्राणवायू कमी झाला तर त्याचे परिणाम माणसाच्या दृष्टीने त्रासाचे ठरणार आहेत. समुद्र इतके प्रचंड असल्यामुळे समुद्रांत सोडली जाणारी रसायने तेथे फारसा परिणाम करीत नसावीत असे आपल्याला वाटू शकेल. परंतु याबाबतीतले वास्तव फार वेगळे आहे. समुद्र संशोधकांचे म्हणणे असे आहे की, प्लास्टिकच्या उत्पादनात वापरली जाणारी रसायने अखेर समुद्रात सोडली जातात आणि त्यामुळे प्रकाश विश्लेषण अथवा फोटोसिंथेसिसमधून निर्माण होणारा आणि जगातील सर्वात मोठा प्राणवायूचा स्रोत धोक्यात आला आहे.

सर्वसाधारण माणसाला रोज किती प्राणवायू आवश्यक असतो हे समजून घेणे येथे महत्त्वाचे आहे. दररोज प्रत्येक माणसाला ५५० लिटर्स प्राणवायू लागत असेल तर प्रत्येक मिनिटाला २१० मिलीलिटर्स असे हे प्रमाण येते. आणि ही गरज वयोमानानुसार तसेच आपण जे काम करतो त्यावर आणि आपल्या आरोग्यावर अवलंबून असते. आज जिकडेतिकडे प्लास्टिक आणि त्याचे

दुष्परिणाम याबद्दल चर्चा सुरु असल्यातरी इतके असूनही आपण आज आपल्या घरातला प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. समुद्रांच्याबाबतीत विचार केला तर असे दिसेल की, तेथे अगदी दहा हजार मीटर्स खोलीवरही प्लास्टिकची पिशवी आढळली आहे. याचा अर्थ तिचे विघटन तेथेही होऊ शकत नाही.

समुद्रात जीवाणू असतात आणि ते प्राणवायूची निर्मिती करतात. या प्राणवायूमुळे समुद्र काही प्रमाणात प्रदूषणावर मात करू शकतो. जगाचा दहा टक्के प्राणवायू हे जीवाणू तयार करीत असतात. समुद्रात जर रसायने फेकली गेली आणि त्यांचे प्रमाण प्रचंड झाले तर सुरुवातीला या जीवाणूंची संख्या कमी होईल आणि त्यासोबतच समुद्रातील आणि जगातील प्राणवायूचे प्रमाणदेखील कमी होईल. यावर संशोधन करताना असे दिसले की, जगाच्या वाढत्या तापमानाचादेखील प्राणवायूच्या स्तरावर परिणाम होतो. सागरी पर्यावरणात तेथील जीवसृष्टीसोबत तेथील वनस्पतीदेखील महत्त्वाच्या असतात. या दोन्हीवर रासायनिक पदार्थांचा विपरीत परिणाम होतो. माहिती अशी मिळते की, युरोपियन युनियन आणि ब्रिटन या देशांनी एकदा वापरण्याच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. परंतु अशा बंदीचा प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. कारण आज सर्रास प्लास्टिक पिशव्या दिसत आहेत.
“हे विश्वचि माझे घर” अशी आपली भावना असेल तर हे घर आपले एकट्याचेच नसून जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी अशा सर्व ठिकाणी असलेल्या जीवांचेही घर आहे आणि ते आपल्या परीने प्राणवायू निर्माण करून पर्यावरणाला मदत करीत आहेत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी आणि सर्वांसाठीच आवश्यक तेवढा प्राणवायू मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...

आता होणार खग्रास सूर्यग्रहणही कृत्रिम!

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे. “सूर्यग्रहणाची वाट कशाला बघायची? आम्ही विज्ञानाची करामत करून केवळ दोन उपग्रह अवकाशात सोडणार आणि सूर्यग्रहण होईल......

लक्षात घ्या.. पाण्याचा जीव गुदमरतोय!

आधुनिक विज्ञान असे सांगते की, ताजे पाणी तसेच प्राणवायू यांचे एक जागतिक जलचक्र असते. जलचक्र अनेकांना नद्या, पाण्याचे प्रवाह, सरोवरे आणि तलाव ही केवळ सृष्टीची सुंदरता दाखवणारे भाग नसून ते पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे मान्य केले गेले...
Skip to content