Homeमुंबई स्पेशलमुंबईतील पाणी टँकरधारकांचा...

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबिरसिंह बिरा, उपाध्यक्ष जितू शाह, सचिव राजेश ठाकूर, हरबनसिंह यांच्यासह असोसिएशनचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपले विविध प्रश्न मांडले. टँकरधारकांचे प्रश्न नियमानुसार सोडविण्यात येतील. तथापि, लोकांची होणारी गैरसोय पाहता टँकरधारकांनी पाणीपुरवठा त्वरीत सुरू करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनास अनुसरुन संप मागे घेत असल्याचे तसेच गोरेगाव येथे आजच सर्व टँकरधारकांची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

वॉटर टँकर असोसिएशनच्या विविध मागण्या व त्यांना येत असलेल्या अडीअडचणी सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. केंद्र शासनाशी तसेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाशी संबंधित मागण्यांबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल. पाण्याचे टँकर अचानक बंद झाल्याने मुंबईत लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा पद्धतीने पाण्यासारख्या मूलभूत गरजेशी संबंधित बाबीवर लोकांची गैरसोय करणे चुकीचे आहे. त्यामुळे असोसिएशनने तातडीने टँकरचा पाणीपुरवठा सुरू करावा, असे लोढा यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर लोढा आणि असोसिएशनच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जाहीर केले.

विविध नियमांची अंमलबजावणी सक्तीची झाल्यामुळे आज टँकरचालक-मालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो मुंबईकरांचे आतोनात हाल झाले. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा संप पुकारला होता. त्यमुळे मुंबईतल्या अनेक भागांना फटका बसला. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर असोसिएशनचे प्रयत्न सुरू होते. उपनगराचे पालकमंत्री लोढा यांना या संपाची दाहकता समजल्यावर त्यांनी आज लगेचच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्याचवेळी त्यांनी टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर आज त्यांना प्रत्यक्ष चर्चेला बोलाविण्यात आले.

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स आणि काही रुग्णालयांना तसेच विकासकामांना फटका बसला. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर एथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याने हा संप पुकारला आहे. मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर एथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी फक्त मुंबईत केली जात असल्याने याविरोधात आठ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला होता.

मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत. ते विविध ठिकाणी पाणीपुरवठा करतात आणि मुंबई महापालिकेलादेखील मदत करतात. अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यासुद्धा टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

वॉटर टँकर पुरवणाऱ्या मालकाकडे मुंबईत दोन हजार स्क्वेअर फिटची जागा हवी, या जागेमध्ये टँकर पाण्याने भरले जावे, रस्त्यावर कुठेही टँकर पाण्याने भरू नये, पाच ते पंधरा वॉटर टँकरसाठी रोज प्रशासनाची परवानगी घ्यावी,  लॉक शीट तयार करावे, टेलिस्कोपिक मीटरचा प्रत्येक ठिकाणी वापर करावा, प्रशासनाला वॉटर टँकर सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी अॅडव्हान्स द्यावा, एनओसी काढावी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी सक्तीची केल्यामुळे टँकरचालक-मालकांनी संपाचे हत्त्यार उपसले होते.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content