भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊन नितीन गडकरी व भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या तक्रारीत अतुल लोंढे म्हणतात की, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भारतीय जनता पक्ष व उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला आहे. १ एप्रिल २०२४ रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. हा सरळसरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या प्राचार्यांनाही निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी.

लोकसभा निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले होते की, मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही. बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका. परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र गडकरी यांना नागपूरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहे, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.
