सुमारे पाच वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली होती. यशस्वी अभिनेता तसेच उभरता हुआ कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने चित्रपटसृष्टी हळहळली होती. तसेच या आत्महत्त्येभोवती राजकारण गोवले गेले होते. त्यामुळे तेव्हा सारा माहोलच राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजला होता वा गाजवला गेला होता. तेव्हा राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार होते व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. साहजिकच दोघांमध्ये टक्कर होणे ठरलेलेच होते. त्यातच तेव्हा बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा काळ होता. योगायोग बघा आताही काही महिन्यांतच बिहारच्या निवडणुका होऊ घातल्या आहेतच.
वाचकहो, एक गोष्ट लक्षात आली का? सुशांत सिंग राजपूतचा तपास बंद करण्याबाबतचा सीबीआयचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच आला. हाच मुहूर्त साधण्याच्या आधी केवळ दोनच दिवस सुशांत सिंग यांची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची पुन्हा चौकशी केली जावी अशी मागणी एका अर्जाद्वारे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. (https://kiranhegdelive.com/the-unannounced-terror-of-the-thackeray-family-is-over-says-kiran-hegde) या अर्जावरून महाराष्ट्राचे राजकारण तापवले जात असल्याचा अनुभव यासंदर्भात राज्य विधिमंडळात झालेल्या गरमागरम चर्चेवरून जनतेला आलाच असेल. दिशाच्या वडिलांच्या अर्जावर जेव्हा न्यायालयात चर्चा केली जाईल तेव्हा त्यावर लिहिले जाईलच. पण आता फक्त दिशाच्या वडिलांमार्फत गेले सहा-सात महिने या अन्यायविरुद्ध दाद मागण्यासाठी राष्ट्रपती भवनापासून अनेक ठिकाणी दरवाजे ठोठावले गेले आहेत. त्यात काही गैरही नाही. प्रत्येकवेळी संबंधितानी माहिती देताना मात्र पुरेपूर राजकारण केलेले होते. समजमध्यमात ते राजकारण हिरीरीने फिरवलेही गेले होते. मात्र दिशाच्या वडिलांचा अर्ज उच्च न्यायालयाने स्वीकारण्याआधीच जे राजकारण करण्यात आले ते टाळता आले असते तर बरे झाले असते असे मत नोंदवून आता सुशांत सिंग या विषयाकडे वळत आहे.

दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू व नंतर सुशांत सिंग याची आत्महत्त्या ही दोन्ही वेगळी प्रकरणे असली तरी ती एकमेकांशी संबंधितच असल्याने त्याची विस्ताराने मांडणी केली. पाच वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्त्या केली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्याची चौकशी केली. त्यानंतर राज्य सीआयडीनेही त्याची चौकशी केली होती. तरी तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे समाधान न झाल्याने अखेर ही चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. ‘बिहार के छोरे को बम्बई में बेरहमीसे मारा’ असे गळेही काढले गेले. सुशांतच्या आयुष्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टीही जनतेला माहित झाल्या. असो “Nothing matters but the facts without them, the science of criminal investigation is nothing more than a guessing game” या वाक्याच्या अर्थाप्रमाणे त्यावेळी स्वतःच्या माहितीवर आधारित वेगवेगळी कथानके पसरवली गेली.
कालांतराने ही कथानके भंपक असल्याचे सप्रमाण सिद्धही झाले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही याप्रकरणात गोवले गेले होते. “Trauma and sexual abuse are two of our most pressing human and sociate problems. They must be studied by unbiased investigation rather than by hysteric and prejudiced manner” हे भान याप्रकरणी कुणीच ठेवले नव्हते, असे खेदाने नमूद करावे लागत आहे.

“खांद्यावरती तुझ्या उतरते
तेच कबुतर पुन्हा
आणि पुन्हा मज आठवला तो
इतिहासातील गुन्हा” (कुसुमाग्रज)
सुशांत सिंग याच्या आत्महत्त्येप्रकरणी सीबीआयने जाहीर केलेल्या अहवालामुळे खरी अडचण झाली आहे ती ‘मातोश्री’ विरोधकांची! भाजपतील मूळ भाजप नेतेही गप्प आहेत. भाजपमध्ये नव्याने सामील झालेल्या नेत्यांची खरी पंचाईत झालेली दिसते. कारण मातोश्रीविरोधात हीच मंडळी आघाडीवर दिसतात. त्यांचे काम जणू ठाकरेंना शिव्या घालणे हेच आहे. आता ठाणे आणि मुंबईतील शिवसेनेचे काही नेते तातडीने दिल्लीला जाणार असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. परंतु शाह यांची भेट झाली नाही तरी केंद्रीय गृहसचिवांना भेटून सीबीआयच्या या अहवालासंदर्भात नाराजी कानावर घालण्याचे तरी ठरलेले आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे पहाटे पहाटे चार वाजता फोन करायचे शिजत आहे. पाहुया कोणता पर्याय निवडतात ही मंडळी!