राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाचा कार्यक्रम, दिनांक ९ जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान होत आहे. यावर सरकारने मदत करा अशा फक्त स्टँडींग ऑर्डर दिल्या आहेत. परंतु मदत होत नाही किंवा शेतकऱ्यांना मदत मिळालेली पाहायला मिळाली नाही. सरकारने एक हजार ८० कोटी रुपये कारखान्यांना मंजूर केले होते. परंतु त्यातून कॅबिनेटने फक्त पाच कारखान्यांना साडेपाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात औसाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे यांचा संबंधित कारखाना, हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कारखान्यांना ही मदत जाहीर केली आहे. बाकीच्या कारखान्यांना मात्र राजकीय नजरेने बघितले जात आहे, असेही ते म्हणाले.
आमच्या महाविकास आघाडीमध्ये असणार्या तिन्ही पक्ष ४८ जागांची चाचपणी करत आहेत. प्रत्येकाला चाचपणी करण्याचा अधिकार आहे. लवकरच पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका जाहीर होण्याअगोदर जागा कुणी लढवायच्या यावर चर्चा होईल. चंद्रपूर तर काँग्रेसची आहे आणि पुणे जागेबद्दल काँग्रेसचे वेगळे मत आहे, आमचेही वेगळे मत आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू असेही अजित पवार म्हणाले.
सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्याप्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे. त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
मी हे राजकीय हेतूने बोलत नाही. दोन तरुणी चर्चा करत आहेत. शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. त्यापासून शेतकरी बेरोजगारांना लाभ मिळतो. त्यासंबंधीची कागदपत्रे एकाच ठिकाणी एक खिडकीवर मिळणार आहे. वास्तविक ही योजना अंतुलेंनी त्यांच्या काळात सुरू केली. त्यावेळेपासून अनेक राज्यकर्ते आले. परंतु कुणीही ती योजना बंद केली नाही. ती योजना गोरगरीब निराधारांच्या फायद्याची होती. उलट त्यात प्रत्येकवेळी रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता ही योजना फक्त ६५ वर्षांवरील लोकांना याचा लाभ मिळतो. त्यामध्ये विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, तृतीयपंथी यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखवल्यानंतरच त्या योजनेचा फायदा मिळतो आणि इथे शासनाच्या जाहिरातीत दोन मुली चर्चा करत आहेत. काय चाललंय आहे. इतकं धादांत खोटं… त्या दोघांनी (शिंदे-फडणवीस) बसावं आणि आपली जाहिरात नीट येते का नीट दाखवतात का, हे तरी बघावं, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
एकाने जरी मी अर्थमंत्री असताना पैसे घेतले असे सांगितले तर मी राजकारण सोडेन आणि खासदार कृपाल तुमाने यांनी सिद्ध करून दाखवावे आणि नाही सिध्द करुन दाखवलं तर त्यांनी घरी बसायची तयारी ठेवावी. हे असले आरोप माझ्यावर करायचे नाही. खाजगीत कुणालाही विचारा माझ्या कामाची पद्धत कशी आहे ती… उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला… त्याने एक तरी माणूस उभा करावा माझ्यासमोर.. अजित पवारांना पैसे दिल्यावर काम झाले सांगणारा… असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी दिले.

