पावसाळ्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या पडून होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्याकरीता मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वृक्षछाटणीच्या कामांत रस्त्यांच्या कडेला उभ्या (पार्क) असलेल्या मोटारी अडथळा ठरत असून वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभी करू नयेत, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मान्सूनपूर्व कामांतर्गत मृत/धोकादायक झाडे व फांद्या यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विभागवार नेमलेल्या ठेकेदारामार्फत हे काम करण्यात येत आहे. तथापि बऱ्याच रस्त्यांवर पार्क केलेल्या गाड्यांमुळे ही कामे करताना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अनावश्यक विवादही उत्पन्न होतो. परिणामी या धोकादायक अथवा मृत झाडांची छाटणी करता येत नाही व ही झाडे अथवा फांद्या पावसात वादळात पडून नागरिकांची जीवित/वित्त हानी संभवते.

नागरिकांनी याकामी सहकार्य केल्यास ही कामे पार पाडून हा धोका टाळता येऊ शकतो. तरी मुंबईतील नागरिकांनी वृक्षछाटणी चालू असलेल्या ठिकाणाहून आपल्या पार्क केलेल्या गाड्या हटवून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागातर्फे करण्यात आले आहे.


