मुंबईत झालेल्या विविध तिरंदाजी स्पर्धेतील चॅम्पियनशीप सामन्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (सावरकर धनुर्विद्या अकादमी) तिरंदाजांनी सर्व स्तरावर यश मिळवून आपले अधिक्य प्रस्थापित केले आहे.
मुंबई विभागीय स्तरावरील तिरंदाजीच्या चॅम्पियनशीप २०२२-२३मध्ये साई (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) कांदिवली येथे झालेल्या स्पर्धेत तसेच बांद्रा येथे अर्जुन स्पोर्टस आर्चरी अॅकॅडमी आणि मुंबई विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा कल्याण येथे झाल्या. या सर्व स्पर्धेत स्मारकाच्या २०पेक्षा अधिक स्पर्धकांनी यश मिळवले. या स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाईही स्मारकाने केली आहे.
मुंबई विभागीय स्तरावरील आर्चरी चँम्पियनशीप २०२२-२३मध्ये १७ वर्षांखालील गटात दर्श झारे आणि श्रमिका घाडीगावकर यांनी सुवर्णपदक मिळवले तर १४ वर्षांखालील गटात वंश पांचाळ, संकल्प जाधव आणि श्रेयसी वैद्य यांनी सुवर्णपदक मिळवले. ही स्पर्धा कांदिवली येथे झाली. मुंबई उपनगरीय जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेत वंश पांचाळ सुवर्ण, नचिकेत देशमुख कांस्य पदकाचे मानकरी ठरले. ही स्पर्धाही कांदिवली येथे झाली.

मुंबई शहर जिल्हा विभागात संकल्प जाधव (सुवर्णपदक), आरव पाठक (कांस्यपदक) तर वीर नायक याची चौथ्या क्रमांकावर निवड झाली. तसेच दर्श झारे (सुवर्णपदक), श्रमिका घाडीगावकर सुवर्णपदकाचे मनकरी झाले. ही स्पर्धा वांद्रे येथे अर्जुन स्पोर्टस आर्चरी अॅकॅडमीमध्ये झाली.
मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धा कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात घेण्यात आल्या. यात आदिती म्हात्रे (सुवर्णपदक), श्वेता गोडसे (सुवर्णपदक), ऐश्वर्या महाडिक (रजतपदक), वेदिका पाटील (कांस्यपदक), हार्दिक अहिरकर (सुवर्णपदक) असा समावेश आहे. कुमार रेड्डी याची चौथ्या क्रमांकावर निवड झाली. आता भटिंडा येथे अ. भा. विद्यापीठांतर्गत होणाऱ्या स्पर्धांसाठी हे स्पर्धक रवाना झाले आहेत.
या सुयशाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे. सावरकर स्मारक धनुर्विद्या अकादमीचे प्रशिक्षक स्वप्निल परब यांचेही त्यांनी कौतुक केले.

