बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) रविवारी १ जानेवारी २०२३ रोजी दोन नवीन विक्रम नोंदविले गेले. एकाच दिवशी सर्वात जास्त पर्यकांनी भेट देणे तसेच एका दिवसात सर्वात जास्त महसूल गोळा होणे हे दोन विक्रम यावेळी झाले.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी येथे भेट दिली. या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा एकाच दिवशी पर्यटक भेटीचा ६ नोव्हेंबर २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात नवीन तुरा खोवला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारची संधी साधून पर्यटकांनी मोठ्या संख्येने या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी एकाच दिवशी ३१ हजार ८४१ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्यादिवशी सुमारे ११ लाख १२ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. हा विक्रम १ जानेवारी २०२३ला मोडीत निघाला. त्यादिवशी तेथे एकाच दिवसात तब्बल ३२ हजार ८२० पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले. यामध्ये ऑफलाईन पद्धतीने २७ हजार २६२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ९ लाख ६० हजार ७२५ रुपये उत्पन्न मिळाले. ऑनलाईन नोंदणी करून ५ हजार ५५८ जणांनी भेट दिली. यातून ४ लाख १८ हजार रुपयांची तिजोरीत भर पडली.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून याठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनीदेखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. कोविड कालावधीत संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले हे प्राणिसंग्रहालय कोविड निर्बंध संपल्यानंतर पर्यटकांसाठी आकर्षणाचे मोठे ठिकाण ठरले आहे. अभ्यागतांची वाढती संख्या आणि त्यासोबत महसुली उत्पन्नात होत असलेली भर यातून ते सातत्याने सिद्ध होत आहे. विशेषतः आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत या उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होते.
नववर्षदिनी विक्रमी संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली होती. अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. तसेच पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनदा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढूनदेखील अतिशय योग्य रीतीने सर्वांना पक्षी, प्राणी आणि उद्यान पाहता येईल, याची प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली. असे असले तरी, सर्वांना सामावून घेणे शक्य नसल्याने मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ४.४५ वाजता बंद करण्यात आल्यानंतर नाईलाजाने काही पर्यटकांना माघारी जावे लागले, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

