Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरी‘महाराष्ट्र फर्स्ट’साठी आता...

‘महाराष्ट्र फर्स्ट’साठी आता राज ठाकरेंचा इशारा!

राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल चार वर्षांनंतर अचानक नाणार रिफायनरीच्या बाजूने उडी घेतल्याने राजकीय वातावरण नव्याने तापण्याची चिन्हे आहेत. नाणार प्रकल्पाच्या आड कोणी आलं तर त्या लोकांनी मनसेबरोबर संघर्षाची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत एक पत्र पाठवले असून नाणार येथील रिफायनरीचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी की आहे. चार वर्षांपूर्वी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाणार प्रकल्पासाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना राज ठाकरे यांनी शिवसेनेला साथ देत नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. आता मात्र त्यांनी पूर्णपणे घूमजाव करत या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांच्या मुद्द्यांवर मार्ग काढावा पण प्रकल्प तेथेच सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी. 

काय म्हणतात राज ठाकरे आपल्या पत्रात?

आज कोकणाच्या आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राच्या वर्तमान आणि भविष्याशी निगडित असलेल्या एका संवेदनशील विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेत आहे. कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्याविषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटनस्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणाच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो. कोकणचं कॅलिफोर्निया होणार असं जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला त्याचा अर्थ कळत नाही. कारण खरं तर कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही. उलट तेच जगातील विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. अर्थात ह्यादृष्टीने एक समग्र विचार कधीच झाला नाही, जो आता व्हायला हवा असं मला वाटतं.

कोकण जितका निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे तितकाच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे आणि नरोत्तमांची खाण आहे. मी माझ्या भाषणात अनेकवेळा ह्याचा उल्लेख केला आहे की, ‘कोकण किनारपट्टी’ असा जर भौगोलिक परिसर बघितला तर ह्या भूमीने ७ भारतरत्नं दिली आहेत. त्यातील ४ तर फक्त एकट्या दापोलीमधील आहेत. पण इतकं असूनदेखील कोकणी तरूण विषण्ण मनःस्थितीत आहे. त्याला नोकरीसाठी, रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. खरं तर पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं. पण, तो विचार नीट झाला नाही. एखादा मोठा प्रकल्प येईल, त्याने भविष्य बदलेल असे आशेचे किरण दिसले खरे, पण ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत.

अशीच एक संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच संदर्भ बदलले आहेत. आपल्या राज्यात, देशात गुंतवणूक यावी ह्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. मध्यंतरी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बेंगळुरूत गेला आणि तो महाराष्ट्रात परत यावा ह्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरू आहे हे मी वाचलं. ही बातमी क्लेशदायक होती. आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही.

ह्या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं रास्त होतं. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती, जी काही प्रमाणात तेव्हा रास्तही ठरली. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग ह्यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की, कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. त्यामुळेदेखील काही भूमिपुत्र चिंतेत होते. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. ह्या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज ह्यावर मार्ग काढणं आवश्यक आहे.

मला मान्य आहे की, ह्या प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिकांची असलेली भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही.

आज कोरोनानंतर (लॉकडाऊननंतर) परिस्थिती बदलली आहे. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. शासन आर्थिक चणचणीचा सामना करत आहे. अशाप्रसंगी राज्य ठामपणे उभं राहण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे पाहयला हवं. ह्या नवीन प्रकल्पामुळे जो रोजगार निर्माण होईल त्यात कोकणी माणसाला आणि पर्यायाने महाराष्ट्रातील मराठी माणसांनाच प्राधान्य असायला हवं, असा करार सरकारने गुंतवणूकदार कंपनीसोबत करायला हवा. तसंच ह्या प्रकल्पामुळे जे उद्योग निर्माण होतील त्यातदेखील कोकणी तरुणांना जास्तीतजास्त संधी मिळायला हवी. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देणं इत्यादी गोष्टी व्हायला हव्यात.

पर्यावरणीय चिंता मीदेखील समजू शकतो. पण ह्या तांत्रिक बाबींसाठी तज्ज्ञांचीच मतं ग्राह्य धरायला हवीत. जैतापूर प्रकल्पाच्या वेळेस मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर ह्यांच्याशी बोलून माझ्या मनातील शंका दूर केल्या होत्या. त्याच पद्धतीने तज्ज्ञांशी संवाद साधून कोकणच्या पर्यावरणाचं नुकसान कसं होणार नाही हे पाहयला हवं. जो प्रकल्प रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अमर्याद संधी आणेल तो आपण स्वीकारणं ही आजची गरज आहे. त्यासाठी कोकणातील तरुण-तरुणींनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे, त्यामुळे ह्या संधीचं सोनं माझे कोकणातील बांधव-भगिनी करतील ह्याबाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. आणि जर त्यांच्या कोणी आड आलं तर त्या लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संघर्षाची तयारी ठेवावी.

राज्य सरकारने आता सामंजस्याची भूमिका घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिकांचं मत बदलवावं. हे करताना संघर्षाची भूमिका अजिबात घेऊ नये. त्याचबरोबर तातडीने कोकणाच्या पर्यटनासाठी एक समग्र धोरण ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. मी वर म्हटलं तसं विकासाचं एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर ठेवणं शक्य आहे. नियती अशी संधी क्वचितच देते. ती गमावू नये ही कळकळीची विनंती. असा प्रकल्प फक्त कोकण किंवा एखाद्या भागालाच उपयुक्त ठरेल असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समृद्ध करू शकेल.

देशाला अभिमान वाटावा असा हजारो वर्षांचा नैसर्गिक आणि जैविक संपदेचा वारसा कोकण किनारपट्टीला लाभला आहे. गाडगीळ समितीच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा विकास कसा साधता येईल आणि निसर्गाची हानी न होता उद्योग आणि प्रकल्प उभे करून स्थानिक तरुणांची प्रगती कशी होईल ह्याचा विचार करून सरकारने धोरण ठरवायला हवं हे मी आपल्याला सुचवू इच्छितो.

सरकारने ह्या संदर्भात जर सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणास सादर करू. आपण ह्या माझ्या म्हणण्याचा योग्य तो विचार कराल आणि राज्याच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घ्याल अशी मी आशा करतो. सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे.. महाराष्ट्र फर्स्ट.. असं धडाकेबाज धोरण असायला हवं.

राज ठाकरे यांच्या पत्रावर राज्य शासनाने सध्या तरी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. उद्यापासून तीन दिवस राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आहे. यात या पत्राचे पडसाद उमटतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content