बांगलादेशशी चर्चा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्या दौऱ्यातील प्रयत्न हा खरोखरच महत्त्वाचा असून त्यामुळे ईशान्य भारतात जाण्यासाठी वाहतूक वेळ वाचेल, तसेच त्यामुळे व्यापारउदिमासाठी मोठा फायदा होणार आहे.
बांगलादेशातून मार्ग मिळाल्याने कोलकात्यापासून ईशान्य भारतातील मिझोराम, त्रिपुरा येथील प्रदेशात जाणे मोठे सोयीस्कर होईल. इतकेच नव्हे तर त्यामुळे ईशान्य भारताच्या आणि बिहारच्या विकासालाही गती मिळू शकेल, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्यावतीने काल, रविवारी आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. यावेळी विविध विषयांवरही त्यांनी मते व्यक्त केली.
स्वातंत्र्यापूर्वीची भौगोलिक स्थिती पाहिली तर त्यावेळच्या नकाशाद्वारे होणारी वाहतुकीची उपलब्धता कशी होती आणि फाळणीनंतर काय स्थिती झाली होती, ते सहज लक्षात येण्यासारखे आहे. बांगलादेशच्या चितगाव बंदराला कोलकात्यातून जोडले जाणे, गंगा नदीच्या बॅकवॉटरचा फायदा मिळणे आदी विविध बाबींबरोबरच बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, थायलंड या देशांशी भारत संबध दृढ करू पाहात आहे व ही बाब अतिशय महत्त्वाची व निकडीची आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सुएझ कालव्यामध्ये झालेल्या जहाज दुर्घटनेत चीनचाही घातपात असू शकतो, असे एक मत असल्याचे सांगून ते म्हणाले की, जहाजाच्या नियंत्रण प्रणालीमध्ये असलेल्या मायक्रोचिप्स या चीनमध्ये बनवलेल्या असल्याने त्याचाही परिणाम म्हणून दुर्घटनेत जहाजाने सारा कालवा ठप्प केला गेला असावा. या प्रकारामुळे चीनच्या वस्तू घेणे किती धोकादायक आहे, तेच त्यातून स्पष्ट होते, असेही महाजन म्हणाले.
चीनच्या विरोधातील स्पर्धेला उतरण्यासाठी भारताने आपली सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद वाढवणे गरजेचे आहे. त्यात लष्करी ताकद हार्ड पॉवर असून ती आपली चांगली, समर्थ ताकद आहे. तर सॉफ्ट पॉवर असलेल्या नेतृत्त्ववादी घटकांमध्ये अनेक सुधारणा विविध क्षेत्रात करण्याची आवश्यकता आहे. सामान्य भारतीयांनीही यात सहभागी होत आपण आपली कामे अधिकाधिक उत्तम करणे आणि जागतिक दर्जा असेलेले काम करून तो दर्जा मिळविल्यास चीनला तोडीस तोड ठरू शकू, असेही त्यांनी सांगितले.

