तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे मुंबईतल्या ‘के पूर्व’ आणि ‘जी उत्तर’ विभागात आज पाणीपुरवठा होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही गळती दुरुस्त करण्याचे काम जल अभियंता खात्याद्वारे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

आज दि. ०८ एप्रिल २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीवर दुपारी ३.३०च्या सुमारास पवई येथे आकस्मिकरित्या मोठी पाणीगळती सुरू झाली आहे. ही गळती दुरुस्तीच्या कामासाठी तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून सदर दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी जल अभियंता खात्यास अपेक्षा आहे.
आकस्मिकरित्या उद्भवलेल्या या गळतीमुळे सध्या सुरू असलेला ‘के पूर्व’ विभागाचा पाणीपुरवठा आणि संध्याकाळी होणारा ‘जी उत्तर’ विभागाचा (धारावी) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. संबंधितांनी याची नोंद घेऊन असलेले पाणी जपून, काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

