मुंबईच्या दादर पश्चिम परिसरात १४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते रविवार दि. २८ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे या २६ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील माहीम-दादर-परळ परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
दादर (पश्चिम) मधील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर अस्तित्त्वात असलेल्या १,४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम जलअभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता हे काम सुरू होईल. रविवार दि. २८ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता ते पूर्ण होईल. याअंतर्गत गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाणीकपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून पॅच वर्क किंवा रिबेट बदलून दुरूस्ती पूर्ण करण्यात येईल. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे. सबब, दुरुस्तीच्या प्रत्यक्ष या कालावधीत जी-दक्षिण व जी-उत्तर विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
या विभागात होणार पाणीपुरवठा बंद
जी उत्तर विभाग- संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात उद्या, २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
जी दक्षिण विभाग- डिलाईल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात उद्या, २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
जी दक्षिण विभाग- ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
संबंधित विभागातील नागरिकांनी जलवाहिनी दुरूस्ती कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

