राज्यात सध्या सरकार नाही, तर टोळीचे राज्य आहे. इतिहासातील सर्वात पळपुटे, डरपोक आणि खंडणीखोर असे हे सरकार आहे. या सरकारमध्ये विकासकामांसाठी कुणी भांडत नाही, तर टक्केवारीसाठी भांडतात, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ठाकरे सरकारचा समाचार घेतला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात लाखो तरुण त्रस्त आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना हे ठावूक नसते की, साऱ्या परीक्षा मंत्रालयात आधीच मॅनेज झालेल्या आहेत. ज्या न्यासा, जीए सॉफ्टवेअरने घोळ केले, त्यांनाच परीक्षांची कामे दिली जात आहेत. भ्रष्टाचाराच्या फॅक्टरीतील हा एक प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
विद्यापीठ कायदा अंधाऱ्या रात्रीत पळपुटेपणा करून पारित करण्यात आला. जी विद्यापीठे शिक्षणाची मंदिरे आहेत, त्यांना राजकारणाचे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे बनवायचे आहेत. या कायद्यातून प्रशासकीय आणि शैक्षणिक अधिकार मंत्र्यांनी आपल्याकडे घेतले आहेत. असा प्रकार देशात कुठेही नाही. विद्यापीठांना सरकारी महामंडळे करण्याचा घाट घातला जात आहे. केवळ पदव्या विकणारे ते केंद्र बनून राहतील. अनेक ‘कोहचाडे‘ यामुळे जन्माला येतील. या कायद्याने सिनेटचे संचालन मंत्री करतील. शब्द वाईट आहे, पण राज्यातील कुलगुरूंना बाबू करणारा हा कायदा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपण्याचे काम आपल्याला करावे लागेल. आज आपण गप्प बसलो तर येणाऱ्या अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणूनच एका मोठ्या संघर्षाला आपल्याला तयार राहावे लागेल. टोकाच्या लढाईसाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आता सज्ज झाले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

