मुंबईतल्या वर्सोवा येथे सागरी किनारी मच्छिमारांसाठी अद्ययावत, सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 336 कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे प्रेझेंटेशन या परिसरातल्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची राज्याचे मत्स्योद्योग विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत दाखवण्यात आले.
वर्सोव्यात अद्ययावत जेट्टी उभारण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी केली होती. मुंबईच्या वर्सोवा खाडीत साचलेल्या गाळामुळे येथील मच्छिमार बांधवांच्या बोटी रुतून बसतात. अनेकदा अपघात होतात. त्यामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या संदर्भात डॉ. लव्हेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार कोटी एक लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे 1,28,586 घनमीटर गाळ काढण्यात आला. गाळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा गाळ नियमित स्वरूपात करण्यात यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी वर्सोवा साचलेला गाळ काढण्याविषयी लक्षवेधी सूचना लावली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकरीता विशेष बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार वर्सोव्यातील साचलेल्या गाळासंदर्भात त्यांनी नुकतीच बैठक लावली. या बैठकीला आमदार लव्हेकर व मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी या मागणीची दखल घेत गाळ काढण्यासंदर्भात आवश्यक निधी मंजूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

