बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्वतयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून छाटणी जवळपास पूर्ण केली आहे. जी झाडे कमी धोकादायक आहेत, अशा उर्वरित झाडांचीही शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात येणार आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने झाडांच्या छाटणीबाबत पूर्ण खबरदारी घेतली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.
पालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे जनतेने लक्ष ठेवावे व त्यानुसार काटेकोरपणे आवश्यक ती दक्षता घ्यावी. पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता पालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबई महानगरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करुन घेण्यात आले आहे. नागरिकांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड अथवा फांद्या तुटण्याची दाट शक्यता असते. याशिवाय वीज कोसळण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसापासून बचाव करताना मुंबईकरांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.

तत्काळ संपर्क करा
सोसायटीच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती अतिधोकादायक असलेल्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात तत्काळ कळवावे, असे आवाहनही उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे. दि. १ ते १९ जून २०२३ दरम्यान पालिकेच्या क्षेत्रात १४७ झाडे आणि २५३ फांद्या तुटल्या आहेत. यात पालिकेच्या हद्दीतील ३९ तर खासगी मालमत्तेतील १०८ झाडांचा समावेश आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये म्हणून उद्यान विभागाने खबरदारी घेत झाडांची छाटणी केली आहे.
वृक्ष छाटणीसाठी बजावल्या नोटिसा
उद्यान विभागाने शासकीय आणि खासगी मालमत्तेच्या ठिकाणी असलेल्या साडेचार हजार झाडांच्या छाटणीबाबत संबंधित विभागांना आणि मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या झाडांचीदेखील लवकरात लवकर छाटणी करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.


